नोकरीच्या मागे न धावता केली दुग्ध व्यवसायास सुरुवात
स्वप्निल खाडे
पळसगाव : शेती म्हटले तर अस्मानी व तुफानी संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज अनेक तरुण शेती व्यवसाय सोडून नोकरी मिळावी, यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. चपराशाची नोकरी तरी हवी, अशी धारणा अनेक शुशिक्षित तरुण वर्गाची झाली आहे; परंतु यास अपवाद ठरत बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी कुटुंबातील ठकसेन यादव धोंगडे या तरुणाने उच्चशिक्षण घेतले. मात्र, नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतातच गोठा बांधून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे.
ठकसेन धोंगडे याचे शिक्षण डीएड, बीएड, एम.एड तसेच एमए समाजशास्त्र व एमए इतिहास असे दोन्ही विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेलेले आहे, तरीही नोकरीची आशा न बाळगता या तरुणाने स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. या तरुणाने चांदा ते बांधा व महाराष्ट्र शासन अंतर्गत मिळणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातून १२ हजार व दोन गायी असे अनुदान घेऊन आपल्या व्यवसायास सुरुवात केली. हळूहळू आता त्याच्याजवळ बारा गायी व त्यांची चार वासरे आहेत. आपला स्वतःचा डेअरी फार्म तयार करावा, असा त्याचा मानस आहे. आज तो आपले दूध कळमना येथील डेअरीत किंवा त्या दुधाचे दही करून बल्लारपूर येथे नेऊन विक्री करत आहे. त्यातून त्याला चांगल नफा मिळत असल्याचे त्याने समाधान व्यक्त केले आहे.
तसेच त्याने आपल्या शेतातच सुक्या व ओल्या चाऱ्याची व्यवस्था केली आहे. ठकसेन याचा संपूर्ण दिवस गायींची देखभाल व व्यवस्था करण्यात जातो. इतर तरुणांनीही त्यातून प्रेरणा घ्यावी, असे त्याचे म्हणणे आहे.
कोट
सुशिक्षित तरुणांनी नोकरी न लागल्यामुळे निराश न होता स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करावा. स्वतःच्या पायावर जिद्दीने उभे राहावे. नोकरीपेक्षाही चांगले उत्पादन या दुग्ध व्यवसायातून घेता येते.
-ठकसेन यादव धोंगडे, दुग्ध व्यावसायिक, पळसगाव