चंद्रपूर : जिल्ह्यातील सात गावात डेंग्यु, विषमज्वर, अतिसार आणि वातावरणातील बदलाने तापाची साथ पसरली आहे. डेंग्युने दोघांचा मृत्यू झाला आहे. या सात गावांना लागून असलेल्या ३६ गावात तापाची साथ पसरू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे साफसफाईच्या सूचना सरपंच, ग्रामसेवकांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील चारगाव, फुरडीहेटी, राळापेठ, तारसा खुर्द, धानापूर, पाचगाव, बोर्डा (झुल्लू), चिंतलधाबा आणि पोंभूर्णा येथे डेंग्यु विषमज्वर, अतिसार आणि वातावरणातील बदलाने तापाची साथ पसरली. सिंदेवाही तालुक्यातील चारगाव येथे डेंग्युने दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर गोंडपिपरी, पोंभूर्णा, बल्लारपूर तालुक्यातील गावातही तापाची साथ पसरली आहे. डेंग्यु रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहेत. ज्या गावात रुग्ण आढळून येत आहेत. त्यांना लागून असलेल्या गावातही अशी साथ पसरू शकण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तविली आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, मेंढामाल, येरगाव, डोंगरगाव, गोंडपिपरी, तालुक्यातील खराळपेठ, घडोली, चकघडोली, भनारहेटी, नांदगाव, सालेझरी, तारसा खूर्द, तारसा बूज, विठ्ठलवाडा, चकविठ्ठलवाडा, करंजी, जोगापूर, चकबोरगाव, बोरगाव, व्यंकटपूर, चकव्यंकटपूर, तोहोगाव, आर्वी, परसोडी, कुडेसावली, आर्वी, बोर्डा बोरकर, डोंगरहळदी, चकहत्तीबोडी, चकपोंभूर्णा, खटमत, केमारा, सोनापूर, चकबल्लारपूर, कसरगट्टा, गंगापूर आणि चक आष्टा येथे साथ पसरू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. या गावात सर्वेक्षण सुरू आहे. सरपंच ग्रामसेवकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रत्येक गावात सूचनांचे कितपत पालन होते, याकडे लक्ष लागून आहे. वाढलेल्या आजाराने अनेकांचा बळी जात असून, वातावरण चिंताग्रस्त आहे. नागरिकांनी आजाराची धास्ती घेतली आहे. गावात स्वच्छता राखण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे अधिकारी करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)
३६ गावांना आरोग्याचा धोका
By admin | Updated: May 24, 2014 23:31 IST