गांगलवाडी : शासनाने हमीभाव केंद्रात धान विक्री कारणाऱ्या शेतकाऱ्यांना ७०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला .त्यामुळे गांगलवाडी येथील धान खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणात नंबर लावले व आता आपल्या धानाचा त्वरित काटा होईल, यामुळे या भागातील शेतकरी खूश झाले असतानाच फक्त १२४ नंबर होताच या भागातील तिन्ही गोदाम फुल्ल झाले.
गोदाम हाऊसफुल्ल झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे. या भागात तीन गोदाम असून गांगलवाडी येथील भाड्याने घेतलेल्या गोदामाची धान साठवून ठेवण्याची क्षमता ८७२६.३४ क्विंटल आहे. इतकी व बरडकिन्ही येथील गोदामाची धान साठवून ठेवण्याची क्षमता २३४२.१४ क्विंटल आहे व विकासनगर येथील गोदामाची धान साठवणूक करण्याची क्षमता ११८१.०३ आहे. लोकमत प्रतिनिधीने या धान खरेदी केंद्रावरील कर्मचारी गणवीर यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
या भागातील तिन्ही गोदामांची धान साठवणूक करण्याची क्षमता एवढी मोठी असताना फक्त १२४ शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्याने हे तिन्ही गोदाम फुल्ल झालेच कसे, असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आमचे धान नंबर लावूनही घरातच पडून आहेत. तर मग या धान खरेदी केंद्रावर कुणाचे एवढे मोठे धान खरेदी करण्यात आले, असा प्रश्न या भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
प्रति शेतकरी ५० क्विंटल धान असणाऱ्यांनाच शासन बोनस देते. त्यानुसार ५० गुणिला १२४ केले तरी हे गोदाम फुल्ल होणे शक्य नाही. त्यामुळे या धान खरेदी केंद्रात काहीतरी आलबेल चालले आहे. त्यामुळे या धान खरेदी केंद्राची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.