वरोरा : नगर परिषदेंतर्गत घरकूल योजनेचा लाभ अनुसूचित बीपीएलधारक व मागासवर्गीयांना मिळत आहे. मात्र वरोरा नगर परिषद अपवाद ठरत असून, त्यामुळे गोरगरिबांची गळचेपी होत आहे. शहरातील वीस वर्षांपासून वास्तव्य करीत असणाऱ्या नागरिकांना वीज, पक्क्या नालीचे बांधकाम, खुल्या जागेचा उपयोग बगीच्यासाठी करण्यात यावा, अशा विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे विदर्भ अध्यक्ष अजय रेड्डी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.शहर विविध समस्येने ग्रासले असून नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. शहरात २० वर्षांपासून राहात असलेल्या झोपडपट्टीवासीयांना स्थायी वीज देण्यात यावी, तसेच शहरात काही वॉर्डातील पक्क्या नाल्यांचे बांधकाम झाले नाही. ते त्वरित करून जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवावे, नाल्याची साफसफाई करावी, वॉर्डात असलेल्या खुल्या जागेवर नगर परिषदेद्वारे उद्यान बनवून ती जागा कार्यान्वित करावी, नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला.परंतु प्रकल्प बंद असल्याने लाखो रुपयांचा खर्च वाया घालविला आहे. तो त्वरित कार्यान्वित करावा, जीएमआर, इस्पात कंपनीतून निघणारी पांढरी राख याचा उपयोग खड्डे बुजविण्यासाठी नंदोरी परिसरात करण्यात येत असल्यामुळे परिसरातील नागरिक तसेच शेतीवर परिणाम होत आहे. नाल्यात ही राख मिसळत असल्याने नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या राखेवर त्वरीत निर्बंध लावण्यात यावा, शालेय पोषण आहारातुन मुख्याध्यापक, शिक्षकांची मुक्तता करून वर्षानुवर्षे आहार शिजविणाऱ्या पूर्ववत कामावर ठेवण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा समावेश होता. मोर्चा आंबेडकर चौकातून निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पालकमंत्री संजय देवतळे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात अजय रेड्डी, आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, साचिका वांढरे, छाया मोहितकर, राजू गहीनेवार, सीमा पवार, संगीता झाडे, संतोष दास यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचा मोर्चा
By admin | Updated: July 6, 2014 23:52 IST