पालिकेचे दुर्लक्ष : पाणी साचून राहत असल्याने आजार वाढण्याची शक्यताब्रह्मपुरी : येथील प्रभाग क्रं. ४ देलनवाडी भागात पहिल्याच पावसाने अनेक सखल भागात पाणी साचल्याने तलावाचे रूप आले आहे. पाणी बाहेर वाहून जात नसल्याने दुर्गंधी निर्माण होऊन आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाण्यातून मोठ्यांपासून तर लहान मुलांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.देलनवाडी भागातील शेषनगर, आनंदनगर, विद्युत कॉलनी, श्रीनगर, शांतीनगर, प्रबुद्धनगर, शिक्षक कॉलनी, गजानन नगर, आदी भागात नवीन वसाहत निर्माण झाली आहे. यातील काही भागात अनेक नागरिक १५ ते २० वर्षापासून वास्तव्यास आहेत. परंतु, अजुनही भौतिक सुविधा पालिकेने पुरविलेल्या नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पहिला पावसातच वॉर्डवासीयांवर आपत्ती ओढावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक भागात पाणी साचून असून पाणी बाहेर काढण्यासाठी नाली नसल्याने पाणी जैसे थे आहे. जागोजागी पाणी साचले असल्याने या भागाला तलावाचे स्वरूप आले असून यापूर्वी नागरिकांनी सह्यानिशी निवेदने दिले. मात्र त्यावर कुठलाही निर्णय पालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला नाही. या भागातून जास्तीत जास्त कराचा भरणा करूनही सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. प्रभागाच्या नगरसेविका डॉ. हेमलता नंदूरकर यांच्या माध्यमातून काही कामे करण्यात आल्याने या भागाची थोडी व्यवस्था सुधारली आहे. परंतू अनेक भागात मात्र समस्यांचा डोंगर उभा असून याकडे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)
ब्रह्मपुरीच्या देलनवाडी प्रभागाला तलावाचे रूप
By admin | Updated: June 24, 2015 01:28 IST