चंद्रपूर : कोरोना रुग्णांवर स्थानिक वन अकादमी येथे उपचार करण्यात येत होते. येथे सफाई कामगारांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र आता काही कामगारांना काढून टाकण्यात आले होते. त्या कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंद्रपुरातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या वन अकदामी येथे व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील साफसफाई करण्यासाठी सफाई कमागारांची नियुक्ती करण्यात आली होती. आता चंद्रपुरात जवळपास कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. त्यामुळे वन अकादमी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी येथील सफाई कामगारांनाही कामावरून काढण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या इमारतीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या या कामगारांना असे बेरोजगार करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिनस्त येत असलेल्या इतर कोणत्याही आस्थापनेत या कामगारांना काम देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक राहुल मोहुर्ले, जितेश कुळमेथे, बादल हजारे, सचिन चिवंडे आदी उपस्थित होते.