पोलिसांचे दुर्लक्ष : महिलांमध्ये संताप जिवती : तालुक्यातील महाराष्ट्र- आंध्रप्रदेश सिमेवरील चौदा गावांकडे नेहमीच अधिकारी आणि पदाधिकारी पाठ फिरवितात. आता पोलीस प्रशासनही या वादग्रस्त चौदा गावांकडे दुर्लक्ष करीत असून या गावांमध्ये अक्षरश: दारूचा महापूर वाहत आहे. गंभीर बाब ही की, पोलिसांकडून दारूविक्रेत्यांना पाठबळ मिळत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र- आंध्रप्रदेश सिमेवरील चौदा गावे गेल्या अनेक वर्षांपासून ‘तळ्यात-मळ्यात’ अशा स्थितीत असताना शासन त्यांच्याकडे फिरकूनही पाहत नाहीत. त्यामुळे येथील जनता कसेबसे जीवन जगत आहे. परंतु येथीलच काही गावात अवैध दारु विक्री मोठय़ा प्रमाणावर होत आहे. परमडोली तांडा, कोढय़ा, मुकदमगुडा आणि लेंडीजाळा या गावांमध्ये गेल्या वर्षभरापासून मोहफूल, देशी तसेच विदेशी दारू अवैधरित्या मोठय़ा प्रमाणात विकली जात आहे. याचा त्रास लक्षात घेता, महिलांनी दारूबंदीसाठी पुढे येऊन ग्रामसभेत दारूबंदीचा ठरावही केला. परंतु दारूबंदी झाली नाही. दारू विक्रेत्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर येथील महिला व नागरिकांनी जिवती पोलीस ठाणे गाठून अवैध दारुविक्रीसंदर्भात तक्रार दिली. पण पोलिसांकडूनही त्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली. जिवती पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आज चार ते पाच महिने लोटले. मात्र कोणतही कारवाई करण्यात आली नाही. अवैध दारूविक्रीमुळे गावकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महिलांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी परमडोली, तांडा, मुकदमगुडा, कोटा, लेंडीजाळा येथील अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
सीमेवरील गावांत दारूचा महापूर
By admin | Updated: May 25, 2014 23:26 IST