चंदू पाटील मारकवार : बिबी येथे स्वच्छता अभियान व सत्कार सोहळानांदाफाटा : आपलं घर, आपला गाव, आपला समाज, आपणच पुढे नेवू शकतो. ती धमक व ताकद आपल्यात आहे. त्यासाठी थोरांच्या विचारातून व स्वत:च्या कृतीतून आदर्श गावाची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव राजगडचे माजी सरपंच चंदू पाटील मारकवार यांनी केले. ते बिबी येथे समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक संस्था, सेवार्थ ग्रुप व साई स्पोर्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मोहीम व सत्कार सोहळ्यात शुक्रवारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच इंदिरा कोडापे होत्या. स्वागताध्यक्ष डॉ.गजानन काकडे, विशेष अतिथी समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, संजय पेटकर, अरुण वाकुडकर, श्रीधर हंसकर आदी उपस्थित होते.दरवर्षी बिबी येथील युवक फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करून ग्रामस्वच्छतेने दिवाळी साजरी करत आहे. यंदा रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वृक्षारोपण व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमातून गावात वातावरण निर्मिती करून आदर्श गावाच्या संकल्पनेसाठी चंदू पाटील मारकवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील आजी-माजी सरपंच-उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला. दादाजी पिंपळकर, चंद्रकांत झुरमुरे, संतोष पावडे, आशाताई मडावी, साईनाथ कुळमेथे, मारोती नैताम, विठ्ठल गेडाम, बबनराव मडावी, राजकुमार हेपट, इंदिरा कोडापे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सकाळी युवकांनी श्रमदान करून गावात स्वच्छता मोहीम राबवली. यात गावातील तरुण सहभागी झाले. क्रिडांगण परिसरात कडुलिंबाची ७० वृक्ष लागवड करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत प्रथम जया दीपक कापटे, द्वितीय स्वाती कोडापे, तृतीय अश्निी आमने तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम साक्षी पाचभाई, द्वितीय प्राची खारकर, तृतिय अनामिका शिल यांनी क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून त्यांना पुरस्कृत करण्यात आले. सायंकाळी स्व. उद्धवराव बोबडे बहुउद्देशीय संस्था टेंभूरवाही निर्मिती ‘लोकजागर’ हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. संचालन अविनाश पोईनकर, प्रास्ताविक प्रा. आशिष देरकर तर आभार सचिन खनके यांनी मानले. यशस्वीतेसाठी इराणा तुम्हाणे, गजानन सोनटक्के, उदय काकडे, आसिफ शेख, आशिष पोईनकर, उमेश सपाट यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
आदर्श गावाची निर्मिती थोरांच्या विचारातून व स्वत:च्या कृतीतून साध्य करा
By admin | Updated: November 18, 2015 01:11 IST