नागरिकांचे आरोग्य धोकादायक : परिसरात घाणीचे साम्राज्य वाढलेसावली : सावली नगरातील बल्लमवार ते बाजार मार्गावर एका प्रतिष्ठित नामवंत नागरिकाचे स्वत:च्या आवारात (गालकीच्या) शेणखताचा मोकळा (खुल्या जागेत) ढिगारा आहे. पावसाचे पाणी पडल्यानंतर या ठिकाणाहून रंगीबेरंगी पाणी मुख्य मार्गावर सतत वाहत असते. यामुळे नागरिक व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गाहून दुचाकी, चारचाकी, सायकलस्वार, पायदळ नागरिकांची सतत वर्दळ असते. मार्गक्रमण करताना ये-जा करणाऱ्या नागरिकांना फार मोठी अडचण निर्माण होत आहे. शेणातून वाहत येणारे जिवजंतु रस्त्यावर वाहत असतात. त्यामुळे पायदळ जाणाऱ्या नागरिकांना याचा फार मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या शेणखताच्या ढिगाऱ्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली. मात्र याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. सावली ग्रामपंचायतीचेही याकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.येथील वार्ड नं. ६ मधील बल्लामवार चौकातून गावात जाण्याकरिता तिन रस्ते एकत्र मिळतात. या मार्गावर राष्ट्रीयकृत बँका, सहकारी पतसंस्था, खासगी दवाखाने, मेडीकल्स (औषधालये), जीवनावश्यक वस्तुचे दुकान, ज्वेलर्सची दुकाने असल्याने हा वार्ड चांगलाच गजबजलेला असतो. याठिकाणी जुनी लोकवस्ती आहे. तसेच सहकारी मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागे लागून हा परिसर आहे. या ठिकाणी शेणखताचा व प्लास्टिक पिशव्यासारख्या टाकाऊ पदार्थाचा ढिग असतो.या बाबीविषयी घराशेजारील व्यक्तीकडून तोंडी सूचना देण्यात आल्या. पूर्वी ग्रामपंचायतीकडे कार्यभार असताना हटविण्याची मागणी केली होती. पण या बाबीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता हलक्या पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस पडल्यावर या ठिकाणाहून पाणी रंगीबेरंगी वाहत असते. तसेच घराशेजारील लोकांना या पाण्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत असतो. पण संबंधितांना याचे काहीही सोयरसूतक नाही. त्यामुळे इतर नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.याविषयी नागरिक तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु दौऱ्यामुळे भेट होऊ शकली नाही. या वॉर्डातील लोकांना ये-जा करणाऱ्या नागरिकांना सततच्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीकडे सध्या नगर पंचायतीचा कार्यभार सांभाळत असणाऱ्या तहसीलदारांनी त्वरित लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या गजबजलेल्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य ही फार मोठी शोकांतिकेची बाब आहे. यापासून जागा मालकाचे घर ३० फुट दूर आहे. त्यामुळे या बाबीचा त्रास त्यांना होत नाही. मात्र दुसऱ्या नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. सदर मालक एक प्रतिष्ठित नामवंत व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना सूचना करण्यास नागरिकांना भीती वाटते. परंतु नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता हा शेणखताचा ढिगारा उचलून दुसरीकडे ठेवावा यासाठी नगर प्रशासनाने सुचना करावी, अशी मागणी गणेश वनलावार, संदेश वनकेवार, रूपेश येनुरवार, अंकुश वनकेवार आदीनी निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेणढिगाऱ्याचे पाणी रस्त्यावर !
By admin | Updated: August 15, 2015 01:21 IST