पाण्याचे संकट : उष्णतेमुळे पीक लागले करपायलासिंदेवाही : तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ असलेल्या विविध पाणी स्त्रोतून आईल इंजिनच्या साहाय्याने पिकांसाठी पाणी देण्याचे काम सध्या शेतकरी रात्रंदिवस करीत आहे.तालुक्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेतकरी धानाचे पीक घेतात. अशा परिस्थितीत शेतकरी शेताजवळून वाहणारी नदी, नाले, बोडी, तलाव आदीमधून इंजिन व वीज पंपाद्वारे पाणी घेत असतात. यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाला. दरवर्षी पेक्षा पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी नसल्या कारणाने रोवणीच झाली नाही. ज्यांनी विलंबाने रोवणी केली. त्यात धानाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. उन्हाच्या काहिलीने धान पीक करपू लागले आहे. ते जगविण्यासाठी शेतकरी नाले, नदी आदी स्त्रोतांद्वारे पाणी दिले जात आहे. काही भागात धानावर विविध रोगांचा थैमान असून शेतकरी त्रस्त आहेत. शासनाने तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By admin | Updated: October 10, 2015 00:17 IST