गेवरा: प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत. मग इतर गरजा भागविणे तर दूरच. त्यांचा कच्चा माल मातीमाल विकावा लागतो. तोच माल शहरातील कारखान्यात पक्का झाला म्हणजे त्यांना तोच चौपट भावाने विकत घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकरी राजा कसा सुखी होईल? असा सवाल ग्रामगिताचार्य नारखेडे दादा यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना बोलत होते.शेतकरी श्रम करून शेती पिकवितात. परंतु त्यांच्याच नशिबी उपाशी राहण्याची वेळ येते. त्यामुळे जगण्यासाठी त्यांना सतत कर्ज काढावे लागते. कर्ज काढून केलेल्या शेतीवर निसर्गाचाही कोप येतो. त्यामुळे जे कर्जाचे व्याजही भरु शकत नाहीत. शेती विकूनही ते कर्ज फेडू शकत नाही, असे ते म्हणाले.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती साहित्य, खते बियाणांसाठी अनुदानावर अनेक योजना राबविल्या जातात. त्या मिळविण्यासाठी व घरापर्यंत आणण्यासाठी त्यांना शेतीची कामे सोडून प्रवास, वेळ खर्च करुन शासकीय कार्यालयाकडे चकरा माराव्या लागतात. कर्मचाऱ्यांची हाजी हाजी करावी लागते. प्रत्येक कामासाठी लाच घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे वेळवर होत नाहीत. अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना आर्थिक गुलामगिरी व निसर्गाचा फटका सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्तेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे महाभयंकर पाप राज्यवस्थेकडून होत असल्याचे दादा म्हणाले. आता तर पैशाअभावी आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन करु शकत नाही. त्यामुळे शेती सोडून ती भांडवलदारांकडे द्या, असा उरफाटा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. भांडवलदारांकडे शोषणाचा इतका अमाप पैसा आहे की, शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही, असे सांगून ेमनमानी भावाने त्यांच्या शेती खरेदी केल्या जात आहे. या चक्रात शेतकरी अडकत चालला आहे. शेती परवडत नाही म्हणून पैशाचे लोभाने शेतकरी सर्रास शेती विकत आहे. शेतकऱ्यांजवळ आलेला पैसा भांडवलदारांकडे परत येईल. अशा अनेक योजना भांडवलदाराकडे आहेतच. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीही जाणार व पैसाही जाणार शेतीचे सर्व श्रमावर आधारीत धंदे यंत्रावर होवू लागल्यामुळे तेही भांडवलदाराकडे गेले. त्यामुळे सर्व शेतकरी व श्रमिकांच्या हाताला कामच राहिले नाही, आता शेतकऱ्यांसहीत श्रमजीवी समाजाला स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी लाचारी पत्करावी का? असा सवालही नारखेडे दादा यांनी यावेळी उपस्थित केला. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल नाही
By admin | Updated: November 13, 2015 01:14 IST