पाटण : जिवती तालुक्याचा बळीराजा आधीच अस्मानी संकटांनी हैरान असताना शासनातर्फेही त्यांची थट्टाच सुरु असल्याचे चित्र जिवती तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे गेल्या हंगामात शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पन्न एकरी दोन ते तीन क्विंटल झाले. यातही अनेक शेतकऱ्यांनी समाधान मानून घेतले. मात्र यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यात शासनातर्फे शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरील पट्टेधारकाला चार हजार पाचशे तर दोन हेक्टरच्या आतील पट्टेधारक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये याप्रमाणे अपुरे पण काहीतरी मदत देण्यात आली. परंतु जिवती तालुक्यात अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे व बँकांच्या उदासीनपणामुळे ५० टक्के शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणतीच मदत मिळालेली नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून बँक व तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. जिवतीचे तहसीलदार यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपण सुटीवर असल्याचे उत्तर देऊन बोलण्यास नकार दिला.शासन व शासनाच्या या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे, असा प्रश्न पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जिवती तालुक्यातून होत आहे. (वार्ताहर)
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट
By admin | Updated: May 11, 2015 01:04 IST