खुशाल तेलंग यांचे प्रतिपादन : समतापर्व रॅलीचे विसापूर व नांदगाव (पोडे) येथे स्वागतबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांनी जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती संविधानाच्या माध्यमातून दिली. मात्र विद्यमान सरकार संविधानाला नाकारण्याची भूमिका पार पाडताना दिसत आहे. त्यांची तशी मानसिकता प्रकट होत आहे. लोकशाही प्रगल्भ होत असताना हुकूमशाहीच्या वल्गना केल्या जात आहे. संविधानाच्या माध्यमातून देशात समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाकडे वाटचाल सुरु असून सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करीत आहे, असे प्रतिपादन समता अभियान पर्व व संविधान सन्मान रॅलीचे संयोजक खुशाल तेलंग यांनी मंगळवारी नांदगाव (पोडे) व विसापूर येथील कार्यक्रमात केले.अखिल भारतीय समता सैनिक दल जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून समता अभियान पर्व व संविधान सन्मान रॅलीचा चंद्रपूर येथून प्रारंभ झाला. या रॅलीचे स्वागत बल्लारपूर, विसापूर व नांदगाव (पोडे) येथे करण्यात आले. यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ही रॅली ७ मार्च पासून ८ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील १२५ ठिकाणी सामाजिक जागृती व प्रबोधनातून संवाद साधणार आहे. रॅली सोबत समता सैनिक दलाचे पथक व्यवस्था सांभाळत आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर रॅलीचे आगमन झाले. येथे सामाजिक कार्यकर्ते तुळशिराम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खुशाल तेलंग, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सचिव जी. के. उपरे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, पी. एल. शेंडे, मनोहर जयकर, पंढरी मानकर, प्रजेश घडसे, भाऊराव तुंबडे यांची उपस्थिती होती.दरम्यान समता सैनिक दलाच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. प्रास्ताविक प्रजेश घडसे यांनी केले. रिता जिलटे, जी. के. उपरे व प्रमोद देठे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन व आभार भाऊराव तुंबडे यांनी केले. यावेळी समाज बांधवाची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
संविधानामुळे सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना
By admin | Updated: March 11, 2016 01:38 IST