उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : न्याय मागण्या तत्काळ मंजूर करण्याची मागणीबल्लारपूर : महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि कर्मचाऱ्यांप्रति शासनाने सहानुभूती दाखवावी, यासाठी बल्लारपूर येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केले.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांना निवेदन सादर केले.राज्य महसूल कर्मचारी संघटना कित्येक दिवसांपासून सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी करीत आहे. मात्र राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे. याचा विपरित परिणाम महसूल प्रशासनाशी निगडित जनतेच्या कामकाजावर होत आहे. राज्याच्या प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा घटक आहे. याच विभागावर प्रशासनाचा आर्थिक डोलारा उभा आहे. परंतु या विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनस्तरावरुन डोळेझाक केली जात आहे.शासनस्तरावर न्याय मागण्याचा निर्णय जोपर्यंत लागणार नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे, असे संघटनेने म्हटले आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, महसूल विभागातील लिपीकांना महसूल सहायक म्हणून मान्यता देण्यात याावी, नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. कोतवालांना चर्तुथ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासह एकूण २६ मागण्या शासनाकडे लावून धरण्यात आल्या आहेत. न्याय मागण्या सरकारने लागू कराव्या, अशी अपेक्षा अजय मेकलवार यांनी व्यक्त केली.महसूल कर्मचाऱ्यांच्या भावना व मागण्याची सोडवणूक करण्यात याावी म्हणून उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अजय मेकलवार, कुणाल सोनकर, जी.एम. मेश्राम, एम.टी. वादीकर, दत्तराज कुळसंगे, पी.आर. अडबाले, पोर्णिमा नैताम, व्ही.एन. उईके, राजू अंडेलकर, शोभा मुंडरे, ए.एच. गोहणे, निलेश मत्ते, एस.बी. वाढई यांच्या समावेश होता. विशेष म्हणजे मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला होता. लेखनीबंद आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत. (शहर प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By admin | Updated: April 14, 2016 01:05 IST