विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) व परिसरात मागील कित्येक दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विजेचा कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत असून काही उपकरणे जळाल्याची माहिती आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात विजेचा खेळखंडोबा सुरु असून नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे.सध्या सणसुदीचे दिवस आहेत. नागपंचमी, रक्षाबंधन यांच्यासह अनेक सण एका पाठोपाठ येत असून हे सण नागरिक साजरे करण्याचा मनस्थितीत असताना रात्रंदिवस वीज खंडीत होण्याचे प्रकार विरुरसह परिसरातील गावात घडत आहे. हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असून या भागात बहुतांश आदिवासी जमात वास्तव्याला आहे. अंधाराचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी विरुर पोलीस ठाण्यावर सन १९९७ ला हल्ला चढविला. तसेच सन २००४ ला माकुडी या रेल्वेस्थानकावर जाळपोळ करण्यात आली. तेव्हापासूनच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील एका महिन्यापासून वीज पाच मिनीटे राहते तर अर्धा तास जाते. वीज किती वेळा जाते अन कितीवेळा येते, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे ओलीत करणारे शेतकरी वर्गसुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अलिकडे तर १२ तासाचे भारनियमन होत असल्याचे जाणवते. विजेवर चालणारे उद्योगधंदे प्रभावित झाले आहे. लहान आटाचक्की, कांडप केंद्र, एसटीडी केंद्र, इंलेक्ट्रॉनिक्स वस्तु विकणारे व दुरुस्ती करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील वीज पुरवठा नसल्यासारखाच असतो. मात्र वीज देयके तेवढेच. विरुर येथे २२० केव्ही व ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र आहेत. त्यामुळे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता व वीज कर्मचारी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. परंतु स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच स्वत:च्या सोईसाठी अधिकारी वर्ग व कर्मचारी बाहेर गावावरुन येणे-जाणे करतात. त्यामुळे वीज सेवा खंडीत झाल्यास वीज कर्मचाऱ्यांची चतकोराप्रमाणे वाट बघत राहवे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते. विरुरात दोन वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. परंतु त्यातील एक वीज कर्मचारी विद्युत पोलवर चढून काम करु शकत नाही. वीज कर्मचारी दारूच्या आहारी जाऊन तुल्ल असतात. त्यामुळे अडचण पुन्हा वाढली आहे. त्यांच्याकडून काम करुन घेणे धोक्याचे असते.विजेच्या लपंडावामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. विरुर परिसरात विजेचा लपंडाव थांबवावा व कनिष्ठ अभियंता तसेच वीज कर्मचारी मुख्यालयी रहावे, अशी मागणी जि.प. सदस्य अविनाश जाधव, भिमराव अंगलवार, अशोक जयस्वाल, बंडू रामटेके, मंगेश मडावी, रवी होरे, मारोती पोटे, सर्वानंद वाघमारे, संतोष मेडपुरवार, अरुण चौधरी, बापू धोटे आदींनी केली आहे. (वार्ताहर)
विरुर परिसरात विजेचा लपंडाव
By admin | Updated: August 17, 2015 00:48 IST