संजय वरघने - चिमूरशहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत गाव खेड्यात योजना कार्यान्वित केल्या आहेत. गावातील नळाच्या टाक्या भरण्याकरिता दहा ते पंधरा तास थ्री फेज वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र सध्या चिमूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असल्याने तालुक्यातील खंडसंगी, भिसी, शंकरपूर, नेरी, मासळ, मदनापूर, चिमूर, टेकेपार तथा इतरही गावातील पाण्याच्या टाक्या पाण्याविना ड्राय झाल्या आहेत. तर अनेक ग्रामीण भागात पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा शोभेच्या वस्तु बनल्या आहेत. अनेक गावात तांत्रिक अडचणीमुळे नळ योजना थंडबस्त्यात पडल्या आहेत. चिमूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून २६५ गावांचा समावेश आहे. ८२५ हातपंप सुरळीत सुरु असून १८ हातपंप नव्याने मंजूर आहे. ६ नळ योजना दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावे नसल्यामुळे प्रत्येक गावात हातपंपाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. फक्त तांत्रिक अडचण सिंगलफेज व विद्युत पुरवठा खंडीत या समस्येमुळे ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. तालुक्यातील परिसरात बर्याच भागात पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे. फ्लोराईडमुळे अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत होता. डायरीया या आजाराचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकार्यांनी निवासी राहून या आजाराबाबत सेवा द्यावी.शासनाने ५६0 हातपंपाची दुरुस्ती केल्यामुळे व काही बिघाड आलेल्या हातपंपालाही दुरुस्ती सुरु असल्यामुळे तालुक्यात कोणत्याच गावाला पाण्याचा फटका बसला नाही. शहरासह ग्रामीण जनतेलाही स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ वर्षाआधी नळ योजना सुरु केली. ही नळ योजना पूर्णत: विद्युतीकरणावर अवलंबून आहे. मात्र सध्या चिमूर वीज वितरण उपविभागाद्वारे मागील अनेक दिवसांपासून भारनियमनाचे नावाखाली सिंगलफेज विद्युत पुरवठा १८ तास करण्यात येत आहे. तर उर्वरित सहा तास थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. तसेच भिसी परिसरात दोन दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा होत असून शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे इथेही नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. चिमूर येथील ठक्कर वॉर्ड येथील नागरिकांना बारमाही पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरुन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.नळ योजनेद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पुन्हा विहिरीचे किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या आधार घ्यावा लागत आहे. खडसंगी परिसरात चंद्रपूर जिल्ह्यात फ्लोराईडच्या प्रमाणापेक्षाजास्त आहे. या फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या सबबीखाली शासनाने या गावांना नळ योजना दिली, त्या उद्देशाला वीज वितरण कंपनीच्या सिंगलफेजमुळे हरताळ फासला जात आहे.
सिंगलफेजमुळे पाण्याच्या टाक्या झाल्या ‘ड्राय’
By admin | Updated: June 8, 2014 23:47 IST