लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : वैनगंगेच्या महापुराने तालुक्यातील सुमारे पाच हजार ३०२ घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये ४९० घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत तर ४६७१ घरांची अंशत: पडझड झाली आहे. जनावरांचे १०९ गोठे वाहून गेले असून ३२ झोपडयासुद्धा महापुराने वाहून गेल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातील पडझडीचे आकडे आता उपलब्ध होऊ लागली आहेत.तालुक्यात आलेल्या महापुराने हाहाकार माजला. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरीच्या इतिहासात प्रथमच पुराची पातळी मोठया प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अपरिमित हानी झाली. एक दोन दिवस सातत्याने पाणी वाढत असल्याने सलग तीन चार दिवस घरांमध्ये पाणी साचून राहिले. यामुळे घरांचे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या मदतीला प्रशासन त्वरित धावून आले. त्यामुळे जीवित हानी टळली असली तरी शेतीचे आणि घरांचे नुकसान टळू शकले नाही.पुराचे पाणी उतरताच तालुका प्रशासनाने पंचनाम्यास सुरुवात केली आहे. महसूल विभाग व पंचायत विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान एकूण चार हजार ७०० लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असून उरलेल्या ४०० लोकांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये त्वरित जमा करण्यात येणार आहे. पुरामध्ये संपूर्ण घर पडलेल्या लोकांना ९५ हजार रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.महापुराचा व्यवसायिक व शिक्षणक्षेत्रालाही तडाखावैनगंगेच्या महापुराचा तालुक्यातील व्यावसायिक व शिक्षण क्षेत्रालासुद्धा फटका बसला असून व्यावसायिक व शिक्षण क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वैनगंगेला आलेल्या महापुराने व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्र आपल्या कवेत घेतल्याने अनेक राईस मिलचे तसेच शैक्षणिक संस्थाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात असलेल्या गजानन राईस मिलसह अनेक राईस मिलमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने धान, तांदूळ, कुकुस, कोंडा तसेच मशनरी महापुराच्या विळख्यात सापडले होते. धान, तांदूळ, कुकुस, कोंडा हे पाण्यात राहून कुजून गेले आहेत तर इलेक्ट्रॉनिक मशनरीमध्ये पाणी गेल्याने मशिनरी पूर्णत: खराब झाल्या आहेत. महापुराच्या तडाख्यात जवळपास तालुक्यातील १० ते १५ राईस मिल सापडल्या होत्या. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रालासुद्धा महापुराचा जबरदस्त फटका बसला. बेटाळा फाट्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात महापुराचे पाणी शिरल्याने महत्त्वाची कागदपत्रे तसेच संगणक आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णत: खराब झाले आहेत. यात संस्था चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी शिरल्याने महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, मॉनिटर पूर्णत: खराब झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भविष्यात यामुळे मोठी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने नुकसान भरपाईचे सर्व्हे करताना व्यवसायिक व शैक्षणिक क्षेत्राचेसुद्धा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यावसायिक व शैक्षणिक संस्था चालकांनी केली आहे.तालुक्यातील एकूण पूरग्रस्तांपैकी ४७०० लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून लाडज येथील जवळपास ४०० लोकांचे कागदपत्रआभावी पाच हजार रुपयांची मदत बँक खात्यात टाकण्यास विलंब झाला आहे. एक-दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.- क्रांती डोंबे, उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी.
महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात ४९० घरे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 05:00 IST
तालुक्यात आलेल्या महापुराने हाहाकार माजला. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरीच्या इतिहासात प्रथमच पुराची पातळी मोठया प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अपरिमित हानी झाली. एक दोन दिवस सातत्याने पाणी वाढत असल्याने सलग तीन चार दिवस घरांमध्ये पाणी साचून राहिले. यामुळे घरांचे नुकसान झाले.
महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात ४९० घरे जमीनदोस्त
ठळक मुद्दे४६७१ घरांची अंशत: पडझड : ३२ झोपड्याही वाहून गेल्या, महसूल विभागाचे पंचनामे सुरू