लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल शहर आणि तालुक्यात विकासाची विविध कामे पुर्णत्वास येत असून लवकरच महाराष्ट्रातील आदर्श तालुक्याचे स्थळ म्हणून मुलची ओळख निर्माण होईल असा विश्वास वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी मुल येथे खनीज विकास निधीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या इको पार्कच्या उदघाटन सोहळयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुल नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, नगर परिषदेचे अध्यक्ष नंदू रणदिवे, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुलचे मुख्याधिकारी सरनाईक, सेवानिवृत्त उपविभागीय वनाधिकारी धाबेकर आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मूल शहर व तालुक्यातील नागरिकांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. मूल शहरात कर्मवीर मा.सा. कन्नमवारांचे स्मारक व सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून शहरात सीसीटीव्ही सर्व्हेलंस सिस्टीम स्थापित करण्यात आली आहे.सहा कोटी रू. निधी खर्चुन तालुका क्रीडा संकुल तयार होणार असून ११ कोटी रू. किमतीच्या आठवडी बाजाराच्या कामालासुध्दा लवकरच सुरुवात होणार आहे. शहराच्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे.मूल शहरातील अत्याधुनिक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट ठरणार आहे. लवकरच मूल हे २४ तास नळाचे पाणी देणारे शहर ठरणार आहे. ग्रामीण भागातही विकासाची विविध कामे वेगाने सुरू असून चिचडोह प्रकल्प २०१८ पर्यंत सुरू होणार आहे. माजी मालगुजारी तलावासाठी १५० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. मागेल त्याला विहीर या योजनेचा लाभ शेतकºयांना दिला आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. याकरिता पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात प्रत्येक गावात शुध्द पाण्याची आरो मशिन लावण्यात येणार आहे. कुकुटपालनाचे पहिले केंद्र मूल तालुक्यातच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून उत्तम रस्ते तालुक्यात तयार करण्यात येणार आहे. मूल तालुका व शहर या राज्यातील आदर्श शहर व तालुका म्हणून लौकिक प्राप्त करेल, यावर आपला भर राहणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.या इको पार्कमध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन तसेच २५ सप्टेंबर दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनी नि:शुल्क प्रवेश दिला जाईल, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.उल्लेखनीय असे की खनिज विकास निधीच्या माध्यमातून दोन कोटी ९८ लाख रुपयांचा निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या इको पार्कचे उदघाटन यावेळी एका शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले. या इको पार्कमध्ये पशुपक्ष्यांचे स्टॅच्युज उभारण्यात आले असून आकर्षक पध्दतीने इको पार्कचे बांधकाम करण्यात आले आहे. या पार्कमुळे मूलवासीयांना आता सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी चांगले वातावरण मिळणार आहे. यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय वनाधिकारी धाबेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठया संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.
मूल आदर्श तालुका करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:03 IST
मूल शहर आणि तालुक्यात विकासाची विविध कामे पुर्णत्वास येत असून लवकरच महाराष्ट्रातील आदर्श तालुक्याचे स्थळ म्हणून मुलची ओळख निर्माण होईल असा विश्वास वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मूल आदर्श तालुका करणार
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : इको पार्कचा लोकार्पण सोहळा