अंगणवाडीसेविकांचा मेळावा : शासनाविरूद्ध प्रचंड संतापबल्लारपूर : १० वर्षे सेवा करणाऱ्या अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरली असून अंगणवाडी महिलांची फसवणूक केली गेली आहे. मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी व्यक्त केले. बल्लारपुरात अंगणवाडी महिलांचा मेळावा रेखा रामटेके यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात वंदना मुळे म्हणाल्या, देशातील सर्व कामगार संघटनांना किमान वेतन १५ हजार रुपये मिळावे, ही मागणी सतत लावून धरली. मागील वर्षी २ सप्टेंबरला याच प्रमुख मागणीला घेऊन देशव्यापी संप झाला होता. मात्र शासनाने आश्वासन देऊन महिलांची बोळवण केली, असे सांगितले.गतवर्षी २ सप्टेंबरला देशातील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या वतीने देशव्यापी संप झाला होता. येणाऱ्या २ सप्टेंबरलाही देशातील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. पोकळ घोषणावर विश्वास ठेवू नका व संपात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. दहीवडे यांनी केले. वर्षा आत्राम यांच्या आभार प्रदर्शनाने मेळावा संपला. मेळावा यशस्वी करण्याकरिता सारिका कामतवार, मंजुषा चुरे, कुंदा पावडे, अल्का लिडवे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
मंत्र्यांच्या घोषणांवर विश्वास ठेवू नका
By admin | Updated: August 7, 2016 00:44 IST