सुधीर मुनगंटीवार : गिलबिली येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजनबल्लारपूर : पडणारे पाणी चालवा, चालणारे पाणी थांबवा व थांबणारे पाणी जिरवा, असा संदेश देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाश्वत शेतीसाठी जिल्हाभरात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती गिलबिली येथील जलयुक्त शिवार जलपूजनप्रसंगी दिली. लोकसहभागातून शासनाने जलयुक्त शिवार महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या जलपूजन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, उपविभागीय कल्पना निळ-ठुबे व उपविभागीय कृषी अधिकारी काचोळे उपस्थित होते.लोकसहभागातून जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात तीन हजार ६१३ कामे पूर्ण झाली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला असून याद्वारे शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनसुद्धा केले आहे. ही बाब पाहता शासनाने एकाचवेळी एकाच दिवशी राज्यभर जलपूजन करण्याचा कार्यक्रम राबविला. बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली येथे जलयुक्त शिवारमधून तयार करण्यात आलेल्या बोडीत साठलेल्या पाण्याचे जलपूजन आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार कार्यक्रमाला नागरिकांनी स्वत:चा कार्यक्रम समजून राबवावे, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी केले. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम राबविणार
By admin | Updated: August 17, 2015 00:44 IST