नागरिक निरुत्साही : अल्पकालावधीतच उपक्रम पडला बंद परिमल डोहणे चंद्रपूर प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’(वाहनविरहित दिवस) पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या घेतला होता. त्यावेळी अनेक मोठ्या अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. मात्र अल्प कालावधीतच प्रशासनाला या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदुषणात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. यावर अंकुश घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ डिसेंबर २०१५ पासून प्रत्येक महिन्यांच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’ (वाहन विरहित दिवसाचा) संकल्प केला. त्यानूसार पेट्रोल, डिजेलवर चालणाऱ्या वाहनांचा प्रवास टाळून प्रत्येकाने महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला पायदळ अथवा सायकलने प्रवास करण्याचा संकल्प केला. काही दिवस ही संकल्पना सुरळीत चालली. मात्र अल्प कालावधीतच प्रशासनासोबतच सामान्य नागरिकांनासुद्धा नो व्हेईकल डे चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ‘नो व्हेईकल डे’ ची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक म्हैसकर यांच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आली होती. त्यासोबतच विविध प्रभागाचे अधिकारी, पर्यावरणवादी तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मोहिमेसाठी पुढाकार घेतला होता. याबाबत जनजागृती करण्यासाठी १४ डिसेंबर २०१५ ला गांधी चौकातून आझाद बाग, जटपूरा गेट या मुख्य मार्गाद्वारे सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अनेकजण सायकलने आपले कार्यालय गाठले.तसेच सदर विषयावर परिसंवादाचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहनाची संख्या वाढत आहे. वाहनातून निघणाऱ्या धुरांमुळे वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना श्वसनासंबंधीचे रोग होत आहेत. त्यावर आढा घालण्यासाठी सदर योजनेला सुरुवात करण्यात आली होती. पण अल्पकालावधीतच प्रशासनाला या मोहिमेचा विसर पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बंद पडलेला उपक्रम पुनश्च सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्हा प्रशासनाला पडला ‘नो व्हेईकल डे’ चा विसर
By admin | Updated: December 22, 2016 01:43 IST