तंटामुक्ती योजना परत सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:28 AM2021-01-23T04:28:16+5:302021-01-23T04:28:16+5:30
फोटो बल्लारपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकार कधी पडेल, याचे स्वप्न भाजपने चार वर्षांपर्यंत बघत ...
फोटो
बल्लारपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकार कधी पडेल, याचे स्वप्न भाजपने चार वर्षांपर्यंत बघत राहावे, असा भाजपला टोला लगावत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारच्या भविष्यात काय लोकोपयोगी योजना आहेत, असे सांगत बंद पडलेली तंटामुक्त योजना परत सुरू करणार असल्याची घोषणा केली.
तसेच महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रकरण एका महिन्याच्या आत निपटवून गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची तरतूद केली जात असून, त्याकरिता शक्ती कायदा तयार करण्याकरिता सर्वपक्षीय २१ आमदारांची एक समिती गठीत केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
येथील बालाजी सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. बाबासाहेब वासाडे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुड्रे, राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दीपक जयस्वाल, शहर अध्यक्ष बादल उराडे, बेबीताई उईके, नितीन भटारकार, महादेव चिंचोलकर मंचावर उपस्थित होते.
अनिल देशमुख पोलीस भरतीबाबत माहिती देत पुढे म्हणाले, राज्यात साडेबारा हजार पोलीस भरती होणार असून, त्यातील पाच हजार पोलिसांच्या भरतीचे काम सुरू झाले आहे. राज्यातील तरुण - तरुणींसाठी नोकरीची ही फार मोठी संधी आहे. कोरोना काळात नोंदवलेले गुन्हे नोंदविले जाणार. काँग्रेस व राकाँची युती असूनही चंद्रपूर जिल्ह्यात आमदारांची तिकीट देताना राकाँला नेहमीच डावलले जाते. या घडीला तसे होणार नाही. जिल्ह्यातून युतीमधून राकाँकरिता दोन जागा नक्कीच घेऊ, असे आश्वासन त्यांनी राकाँ कार्यकर्त्यांना दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र वैद्य यांनी केले. संचालन संजय वैद्य यांनी केले.
बॉक्स
भाजयुमोकडून देशमुख यांना काळे बॅनर दाखविले
शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बल्लारपूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जात असताना येथील भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बसस्थानक परिसरात भाजयुमोचे जिल्हा युवा अध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी त्यांना काळे बॅनर दाखविले व सरकारच्या धोरणाचा निषेध केला.