मूल : मूल शहराला २४ तास पाणी पुरवठा करणारी योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामधून टंचाईग्रस्त क्षेत्रातून मंजूर झाली असून सदर योजना पुर्णत्वास आली आहे. २८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या योजनेचा अधिकारी व पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे बट्टयाबोळ झाला आहे. सदर योजनेचा संपूर्ण निधी खर्च करुनही योजनेत त्रुटया दिसत आहेत. याकडे लक्ष घालून योजना चांगल्या प्रकारे नागरिकाच्या उपयोगात येईल, अशी कार्यान्वित करावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना निवेदनाव्दारे केली आहे.
मूल शहरातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे यासाठी २८ कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना अस्तित्त्वात आली. सदर
योजना पूर्ण झाल्याचा बनाव करण्यात आला आहे. मात्र योजना पूर्ण झाली. तेव्हापासून मूल नगरपरिषद क्षेत्रात पाणी पुरवठा योग्य पध्दतीने होत नसल्याची जनतेची ओरड सुरु आहे. नळ जोडणी देताना करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंट रोड फोडण्यात आले. त्यामूळे रस्ते कमकुवत झाले आहेत. २८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची चौकशी करुन संबंधित प्रकरणातील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी मूल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली. तसेस नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असून जर ती योजनेच्या निकषाप्रमाणे न केल्यास मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रसंगी उपतालुका प्रमुख सत्यनारायण अमरूदिवार, मधुकर पवार, कपिल येलगेलवार, संदिप निकुरे, राहुल महाजनवार, निखिल भोयर, अरविंद करपे, आशिष गुंडोजवार,श्रीनिवास कन्नुरवार आदी उपस्थित होते.