पंचनाम्याचा अहवाल अप्राप्त : बळीराजा हवालदिलमाजरी : माजरी वस्ती येथील शेतकरी सुरेश पुंडलिक दैवलकर यांचे नऊ एकर शेतातील कपाशीचे झाडे अचानक करपली. याबाबत चौकशी करण्यात आली मात्र अज्ञात रोगामुळे कपाशी नष्ट झाली की, बियाणे, खत, मशागत की इतर कोणती कारणे आहेत हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. यामुळे बळीराजाची मोठी आर्थिक कुचंबणा झाली आहे.एक महिन्यापूर्वी दैवलकर यांनी कपाशीचे पीक अचानक वाळले जात असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी व तलाठी यांना लेखी निवेदनाद्वारे केली. यानंतर वरिष्ठ अधिकारी नागपूर-वरोरा यांना सुद्धा भ्रमणध्वनीद्वारे कळविले. तालुका कृषी पर्यवेक्षक यांनी शेतीचा पंचनामा केला. मात्र पुढे काय झाले, कपाशी करपली कशी, कारणे आणि वरिष्ठांचा अहवाल कुठे गेला, हे अद्यापही कळू शकले नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. नऊ एकर कपाशीच्या शेतीसाठी आतापर्यंत बी-बियाणे, खत, फवारणी, मजुरी, रखवालदारी व इतर मशागत यासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये खर्च आला आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कृषितज्ज्ञ पथक महाबीज बियाणे कंपनी, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील संशोधक यांच्याद्वारे पाहणी व यानंतर प्रयोगशाळा द्वारा अहवाल मिळणार असल्याचे कृषी पर्यवेक्षक म्हणाले. आश्वासन देवून दहा दिवस उलटले. मात्र कपाशीच्या अज्ञात आजाराचा अद्यापही या शेतकऱ्याला अहवाल प्राप्त झाला नाही. नुकसानीचा अहवाल मिळाला असता तर वाळलेले कापूस शेती मोडीस करुन या शेतजमिनीवर रबी पिकाची पेरणीची तयारी करता आली असती. गरजेच्या वेळी सरकारी यंत्रणा वेळेवर मदत करीत नाही आणि एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर कुटुंबीयांच्या तोंडाला मदतीचे पाने पुसली जातात. मात्र संकटकाळी हवालदिल झालेल्या बळीराजाला शेतकऱ्यांसाठी विशेष लक्ष दिले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण
By admin | Updated: October 10, 2015 00:16 IST