चंद्रपूर : रोजंदारी वनकामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आनंद भवन भानापेठ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वनकामारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.राजेश पिंजरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ वन कामगार संघटनेचे अध्यक्ष दहीवडे तसेच वामन बुटले उपस्थित होते.दिर्घकाळ रोजंदारीने काम करणाऱ्या वन कामगारांना कायम करण्यात यावे, या मागणीसाठी शिष्टमंडळाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. तसेच आपण मेळाव्याला भेट द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात आली. त्यांनी विनंती मान्य केली व प्रत्यक्षात आनंद भवन भानापेठ येथे उपस्थित झाले. प्रास्ताविक भाषणात दहीवडे म्हणाले, येथे आलेले सर्व कामगार गेल्या आठ वर्षापेक्षा जास्त कार्यकाळापासून काम करीत असले तरी वर्षातून २४० दिवस कोणत्याही कामगारांचे पुर्ण झाले नाही. ९० दिवस होताच या कामगारांच्या नावावर पगार न काढता कामगारांच्या ऐवजी भावाच्या नावावर तर वडिलांच्या नावावर पगार काढण्यात येतो. काम एकाने करायचे आणि पगार दुसऱ्याच्या नावावर काढायचा, ही प्रथा तात्काळ बंद झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा खरोखरच कामगारावर अन्याय आहे. हा कामगारांच्या जिवनाशी खेळ आहे. याकडे आपण स्वत: लक्ष देऊ आणि कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन सचिन झाडे यांनी केले. आभार विठ्ठल पवार यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी नितेश टोंगे, विनोद सांगोळे, सुभाष बोरूले, भानुदास चव्हाण, विलास मारकवार आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
रोजंदारी वनकामगारांना न्याय देण्याची मागणी
By admin | Updated: November 16, 2015 00:51 IST