चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विशिष्ट समुदायाबाबत अवमानकारक मजकूर पाठविला जात होता. याबाबतची तक्रार पोलिसात देताच पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. सध्या तिघेही तुरुंगाची हवा खात आहेत. सध्या शहरापासून तर, ग्रामीण भागातही व्हॉट्सअँपवरून संदेश पाठविण्याचा प्रकार वाढला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह युवक मोठय़ा प्रमाणात व्हॉट्सअँपचा वापर करीत आहेत. व्हॉट्सअँपचा वापर चांगला केल्यास तो फायदेशीर आहे. मात्र त्याचा दुरुपयोग केल्यास तुरुंगाची हवाही खावी लागते. असाच प्रकार चंद्रपुरात घडला आहे. अवमानकारक मजकूर पाठविण्यात आला. याची तक्रार पोलिसात मोहसीन शेख रफीक शेख यांनी दिली. या प्रकरणात प्रफुल सुनील गिर्हे (२१), विनोद आबाजी सोनटक्के आणि शक्ती हरपालसिंग ठाकूर (३१) यांना पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. यापूर्वीही असे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. सोशल मीडियावरुन विशिष्ट समुदायाबाबत धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश पाठविले जात आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर होताना दिसत आहे. अशा कृत्यांमुळे अनेकदा वाद निर्माण होताना दिसते. यात संदेशवहनामध्ये १६ मे नंतर अचानक वाढ झाली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध कलम २९५ (अ) आयपीसी तथा आयटी कलम ६६ (अ) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीने दोन्ही आरोपींना या मजकुराचा संदेश पाठविला. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी स्वत:च्या ग्रुपमध्ये हा संदेश टाकला. या संदेशामध्ये एका विशिष्ट समुदायाबाबत अत्यंत अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये यावर्षी मोठय़ा प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर केला गेला. व्हॉट्सअँपवरून अनेकांनी आपला मित्रपरिवार जोडला आहे. मात्र त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्याने अनेकांना पोलीसहवाही खावी लागत आहे. (नगर प्रतिनिधी)
सोशल मीडियावर अवमानकारक संदेश
By admin | Updated: May 24, 2014 23:30 IST