अनुदान न मिळाल्याने शेतकरी हैराण
भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरीसाठी अनुदान जाहीर केले होते. शेतकऱ्यांनी विहिर बांधल्याची कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करूनही अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांनी उधारीवर बांधकामाचे साहित्य विकत घेतले. पं. स. कडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छता कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
वरोरा : नगर परिषदअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. अर्हताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, अशी मागणी महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेने केली आहे.
कचरा पेट्यांची स्वच्छता करावी
चिमूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील कचरा पेट्याही तुंबल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नगरपंचायतने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कृषिपंपाच्या बिलात दुरुस्ती करावी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना चुकीचे वीज बिल देण्यात आले. काही शेतकऱ्यांच्या कृषिपंप वीज जोडणीची प्रक्रियाही प्रलंबित आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले होते. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी केली आहे.
दुर्गापूर मार्गावरील अतिक्रमण हटवा
चंद्रपूर : येथील निर्माणनगर, तुकूम प्रभाग क्र. १ येथे दुर्गापूर रोडपासून निर्माण नगर रोड, यशोगंगा लॉनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिक्रमण वाढले आहे. दुर्गापूर रोडपासून ते निर्माणनगरचा रोड हा ६० फुटाचा आहे. परंतु दोन्ही बाजूच्या रहिवाशांनी यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तो मार्ग अरुंद झाला आहे. पाण्याची पाईपलाईन व नालीकरिता जागा शिल्लक नाही. त्यामुळे या मार्गावरुन वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येत आहेत.
बोटेझरी, कोळसा येथे मूलभूत सुविधांचा अभाव
चंद्रपूर : शासनाने बोटेझरी व कोळसा या गावांचे २००७ ला भगवानपूर येथे पुनर्वसन केले. मात्र, अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींही येथील समस्या जिल्हा प्रशासनाकडे प्रभावीपणे मांडत नाही. परिणामी, समस्या जैसे-थे आहेत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर अनिष्ट परिणाम
चिमूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़ बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़ यंदा अल्प उत्पन्न झाल्याने शेतकरी हैराण झाला़ कुटुंबाच्या गरजा भागविताना ओढाताण होत आहे़ त्यामुळे आरोग्यासाठी खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़ त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिक करीत आहेत.