चंद्रपूर: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करीत शनिवारी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी चंद्रपुरात रस्त्यावर उतरले. गांधी चौकात दिवसभर दिलेले धरणे, भाषणबाजी आणि दुपारी निघालेल्या मोर्चामुळे शहरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शनिवारी हे आंदोलन करण्यात आले. यात चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भाग घेतल्याचा दावा आयोजकांनी केला. राज्य आणि केंद्र सरकारकडून घोषषणा होऊनही शेतकऱ्यांना मदतीची न मिळणे, चंद्रपुरातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालायाची जागा म्हाडा वसाहत किंवा वनरजिक महाविद्यालयाच्या परिसरात करणे, नक्षलग्रस्त यादीतून वगळलेले आठही तालुके पुन्हा यादीत समाविष्ठ करणे, डिझेल व पेट्रोलचे दर कमी करावे या मागणीसाठी हे आंदोलन होते.दरम्यान, दुपारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यावर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत गांधी चौकात धरणा देण्यात आला. यावेळी नेत्यांनी भाषणाच्या माध्यमातून भाजपा-शिवसेना सरकावर कडाकून टीका केली. (जिल्हा प्रतिनिधी)
केंद्र व राज्य सरकारच्या निषेधात काँग्रेस रस्त्यावर
By admin | Updated: January 31, 2015 23:16 IST