काँग्रेस व भाजपचा आपणच जिल्ह्यात वरचढ असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:23+5:302021-01-19T04:30:23+5:30
बाॅक्स जिल्ह्यातील ७५ टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा - काँग्रेस चंद्रपूर जिल्ह्यातील ६३९ पैकी ७५ टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेस व ...
बाॅक्स
जिल्ह्यातील ७५ टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा - काँग्रेस
चंद्रपूर जिल्ह्यातील ६३९ पैकी ७५ टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेस व महाविकास आघाडीने दावा केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढली. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात काँग्रेससह महाविकास आघाडीने ७५ टक्के यश संपादन केल्याचा दावा केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सोमवारी निकाल लागलेल्या ६८ पैकी ४८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर काही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यश संपादन केल्याचा दावा केला आहे. सिंदेवाही तालुक्यात ३८, सावली तालुक्यात ३५, भद्रावती तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसह वरोरा विधानसभा मतदारसंघात ९० टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दावा केला आहे. राजुरा विधानसभा मतदार संघातील ७९ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी दावा केला आहे. त्यांनीही तालुकानिहाय ग्रामपंचायतींची नावे जाहीर केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी मूल तालुक्यात २२ ग्रामपंचायतींवर काँग्रेस व महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे सांगून गावनिहाय विजयी उमेदवारांची नावेही दिली आहे. चिमूर तालुक्यात काँग्रेसचा ८१ च्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविल्याचा दावा जि.प. गटनेता डाॅ. सतीश वारजुकर यांनी केला आहे.
बाॅक्स
२५ टक्के ग्रामपंचायती आमच्या ताब्यात - राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली गेली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने २५ टक्के ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावाही राजेंद्र वैद्य यांनी केला आहे. हे वर्चस्व जिल्ह्यात चौफेर असल्याचेही वैद्य यांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
३३९ ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व -भाजप
भाजपने जिल्ह्यातील ६३९ पैकी ३३९ ग्रामपंचायतींवर आपला दावा सांगितले आहे. भाजपने शेतकरी ग्रामीण विकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय यादीच प्रसिद्धीला दिली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचे हे यश असल्याचेही म्हटले आहे. चंद्रपूर तालुक्यात २२, मुल तालुक्यात २४, पोंभुर्णा तालुक्यात १७, बल्लारपूर तालुक्यात ८, सावली तालुक्यात २५, नागभीड तालुक्यात २४, चिमूर तालुक्यात ६०, सिंदेवाही तालुक्यात २४, राजुरा तालुक्यात १४, कोरपना तालुक्यात ७, वरोरा तालुक्यात २८, ब्रम्हपुरी तालुक्यात ३३, भद्रावती तालुक्यात ३०, गोंडपिपरी तालुक्यात २३ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे. चिमूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा दावा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केला आहे.