हिमायतनगर- बुद्धगुडा रस्त्याची मागणी
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव विविध समस्येने ग्रस्त आहे. गावात योग्य रस्ते नाहीत, त्यामुळे लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा हा रस्ता तयार करण्याची मागणी बुद्धगुडा गावातील नागरिकांनी केली आहे.
बंद सिग्नलमुळे वाहनधारक त्रस्त चंद्रपूर : येथील ट्रायस्टार हॉटेल चौक, पडोली चौक, मिलन चौक तसेच बाबूपेठ परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावरील सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन होत आहे. त्यामुळे सर्व सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
९१ गरिबांना वृद्धापकाळ योजनेचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : येथील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी साईनाथ बतकंमवार यांची निवड आमदार सुभाष धोटे यांनी केल्यानंतर नियमित प्रत्येक महिन्याला सभा घेऊन गरिबांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे. शुक्रवारी ९१ प्रस्ताव मंजूर केले.
याप्रसंगी तहसीलदार हरीश गाडे, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष साईनाथ बतकंमवार, राजू डोहे, संतोष देरकर, कवडू सातपुते, कोमल फुसाटे, विकास देवाळकर उपस्थित होते.
नांदगाव येथील गतिरोधकाला पांढरे पट्टे देण्याची मागणी
देवाडा बुज. : मूल ते गोंडपिपरी मार्गावरील नांदगाव या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवून अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर गतिरोधकाची सुविधा केली; परंतु वाहनधारकांना हे गतिरोधक दृष्टीस पडत नसल्याने अपघाताची भीती बळावली आहे. कित्येक दुचाकीधारक या ठिकाणी उसळून खाली पडल्याच्या घटना घडत आहेत. या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावेत वा रेडियमचा वापर करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
बेरोजगार संस्थांना काम देण्याची मागणी
चंद्रपूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने बेरोजगार संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे; मात्र या संस्थांना कामच मिळत नसल्याने बेरोजगार कामाची मागणी करीत आहे. विशेष म्हणजे, शासनाने या संस्थांना काम देण्याचे आश्वासन दिले; मात्र या संस्थांना अद्यापही पाहिजे तसे कामच मिळत नाही.
गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेची सभा
कोरपना : ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूरची सभा नुकतीच महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्त प्राचार्य वामन मत्ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब मोहितकर, डॉ. के. आर. भोयर, रमेश भालेराव, हरिभाऊ मोरे, विठ्ठलराव थिपे, प्रा. अशोक जीवतोडे, नगरसेवक अरविंद मेश्राम, प्रा. प्रदीप परसुटकर उपस्थित होते. अनेक ज्येष्ठ सदस्यांची वार्धक्याकडे होत असलेली वाटचाल, आजाराचा धोका, कौटुंबिक कलह यांसह इतर अनेक समस्यांना अलगद बाहेर ठेवून समाजाला काही देणं लागते, याची जाण ठेवून समाजहिताचे व ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करण्याचे निश्चित केले. सभेच्या प्रारंभी स्वर्गवास झालेल्या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेला भव्य भवनाची निर्मिती करून देण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी आमदार सुभाष धोटे यांनी दिल्याने त्यांचे सर्व सदस्यांनी आभार मानले.
‘त्या’ बसेस पूर्ववत करण्याची मागणी
कोरपना : कोरोना लाकडाऊननंतर सर्व बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत; मात्र कोरपना भागातील अनेक बसफेऱ्या अद्याप पूर्ववत करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यात राजुरा-कोरपना-नागपूर, चंद्रपूर-भोयगाव-कोरपना या बसेस अद्यापही सुरू झाल्या नाही. यामुळे या मार्गावरील गावातील नागरिकांना गैरसोयीचे होते आहे. याबाबत राज्य परिवहन महामंडळाचे लक्ष वेधले असता, त्यांचेही दुर्लक्ष होत आहे, तसेच कोरपना येथून जिवती, वरोरा, गडचिरोली, अहेरी, उमरेड, हैदराबाद, ब्रह्मपुरी, असिफाबाद, उटनूरसाठी बसफेऱ्या सोडण्यात याव्या, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
मैदानी खेळाबाबत जनजागृती गरजेची
चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे; मात्र सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाहीत. मोबाइल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाइलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहेत, त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळाची गरज आहे.
कोरोनामुळे गावातील कट्टे थंडावले
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत, त्यामुळे गावातील कट्टे थंडावले आहे. शेतीचा हंगाम संपल्याने सद्यस्थितीत सायंकाळच्या सुमारास कट्टे गजबजलेले दिसून यायचे; परंतु आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तालुका प्रशासन कारवाई करीत असल्याने कट्टे ओस पडत आहेत.
जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प
चंद्रपूर : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले, तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहेत.
आरोग्य केंद्रात दंतचिकित्सकाची नियुक्ती करावी
गांगलवाडी : दिवसेंदिवस प्रत्येक आजारासोबत दातांचे आजारदेखील वाढत असून, दातदुखीच्या रुग्णसंख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; मात्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दंत चिकित्सकांची नियुक्ती केली नसल्याने या रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तालुकानिहाय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना अद्ययावत शेती करण्यास मदत होईल.
वाहतूक शिपायाची नेमणूक करा
नांदाफाटा : येथील शिवाजी चौकामध्ये सकाळी तसेच सायंकाळी वाहनांची मोठी वर्दळ वाढत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहने उभी असतात. त्याचबरोबर कामगार, शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी नांदाफाटा येथे बाजारपेठेत जमलेली दिसते. रस्त्यावरच जड वाहने उभी असल्याने तसेच दुचाकीही ठेवलेली असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पोलीस विभागामार्फत वाहतूक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.