चंद्रपूर : ऊर्जानगर नळ पाणी पुरवठा योजनेचे बुधवारी (दि. १०) भूमिपूजन झाले. हा शासकीय कार्यक्रम होता. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून केवळ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळेच योजनेला मंजुरी मिळाल्याचा कांगावा करणारी पत्रके परिसरात वितरित केलीत. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. शासकीय कार्यक्रमात हस्तक्षेप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात दुर्गापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती ऊर्जानगर ग्रामपंचायतीचे सरपंच बबलू कटरे व अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली.दिवसागणिक वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. याबाबतचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यातही आला होता. त्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात या योजनेला मंजुरी मिळाली आणि खनिज विकास निधीअंतर्गत आठ कोटी ७८ लक्ष ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बुधवारी सांयकाळी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात योजनेचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक गजानन चौधरी यांच्या हस्ते होणार आहे.शासकीय कार्यक्रम असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग चंद्रपूर यांच्यातर्फे निमंत्रण पत्रिका काढण्यात आली. या पत्रिकेत केंद्रीय खते, रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार मितेश भांगडिया, आमदार नाना श्यामकुळे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार बाळू धानोरकर, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले, जिल्हा परिषद सदस्य देवराव भोंगळे, शांताराम चौखे, पंचायत समिती सदस्य रंजना ताजणे, मालाताई रामटेके, सरपंच बबलू कटरे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यपाालन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा उल्लेख करण्यात आला आहे.परंतु, काही भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऊर्जानगरवासींना दिलेला शब्द सुधीरभाऊंनी पाळला असा मजकूर असलेली पत्रके परिसरात वितरित केली आहेत, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
‘त्या’ कार्यक्रमावरून पोलिसात तक्रार
By admin | Updated: June 11, 2015 01:21 IST