अनेकांनी काढले कुलर बाहेर : तापमानात वाढ झाल्याने रात्रीही उकाडा
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला आहे. त्यामुळे उकाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी नागरिकांनी कुलर बाहेर काढले असून शरबर तसेच थंड पेयांची मागणी वाढली आहे. दोन दिवसापूर्वी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे काहीसा थंडावा जाणवला. सध्या तापमान ३९ अंशापर्यंत नोंदविले गेले आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाचा तडाखा जाणवेल अशी चाहूल सध्या लागली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे वातानुकूलित यंत्रासह कुलर, पंख्यांच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. गरिबांचा फ्री अशी ओळख असलेल्या माठालाही मागणी वाढली आहे. तसेच पिण्याचे पाणी थंड रहावे यासाठी बाजारात मातीच्या बाटल्याही उपलब्ध झाल्या आहेत. या बाटल्यांनाही मोठ्या प्रमाणात पसंती आहे. दरम्यान, टोपी, स्कार्फचा वापर वाढला असून टरबूज, काकडी, खरबूज यासारख्या फळांचीही मागणी वाढली आहे.
बाॅक्स
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शनिवारी तसेच रविवारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थोडा गारवा जाणवला. मात्र आता पुन्हा उन्हाचा पारा वाढला आहे. दरम्यान, ३९ अंशापर्यंत तापमान पोहचले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आणखी तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.