बल्लारपूर पोलिसांची कारवाई : चार लाखांचा मुद्देमाल जप्तबल्लारपूर : येथील एका व्यापाऱ्यांच्या दिवाणजीला रस्त्यावर मोटारसायकल आडवी करून लुटल्याची घटना शनिवारी घडली होती. लुटारूंनी दिवाणजीकडील वसुलीचे पाच लाख ५० हजार रुपये असलेली बॅग जबरीने हिसकावून पळ काढला होता. याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात रविवारी करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारीवर्गात खळबळ माजली. बल्लारपूर पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करुन वाटमारी करणाऱ्या टोळीला गजाआड करुन चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.सुनील मनोहर जांभुळकर (३७), विशेष ऊर्फ विशु मोगली कोंडावार (२८) रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड बल्लारपूर व सुनील तिरुपती सिमलावार (२१) रा. महाराणा प्रताप वॉर्ड बल्लारपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन आरोपींची नावे अद्याप कळली नाहीत.येथील व्यापारी रामनारायण खंडेलवाल यांच्याकडे शेख शहादल हैद्दर शेख (५४) रा. कन्नमवार वॉर्ड बल्लारपूर हा दिवाणजी म्हणून कामाला होता. सदर व्यापाऱ्याची उधारी रक्कम वसुलीचे तो काम करायचा. शनिवारी शेख शहादत्त याने राजुरा, गडचांदूर विरुर व नांदाफाटा येथील व्यापाऱ्यांकडून उधारीची रक्कम वसुल केली. ५ लाख ५० हजार रुपये बँगेमध्ये भरुन तो राजुरामार्गाने बल्लारपूरकडे दुचाकी वाहनाने येत होता. वर्धा नदीचे पात्र ओलांडल्यानंतर या घटनेतील पाचही आरोपीने पाठलाग करुन त्याला अडविले. राजुरा ते बामणी (दुधोली) मार्गावर सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान त्याला मारहाण करुन रक्कम असलेली बॅग जबरीने जखमी करुन घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेमुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. शेख शहादत्त यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला गती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हद गिरी यांनी तातडीने बैठक घेवून आरोपींना जेरबंद करण्याची येथील पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निर्देश दिले. येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेर पाच आरोपींना वाटमारी करण्याच्या गुन्ह्याखाली गजाआड करण्यात यश आहे. ही कारवाई उपनिरीक्षक विनोद बावणे, राजेश चुंचूवार, दिवाकर पवार, प्रभाकर जाधव, अमोल नवघरे, संजय पोन्दे, विलास निंबाळकर, सुभाष सिडाम यांच्या पथकाने केली. (शहर प्रतिनिधी)
वाटमारी करणारी टोळी गजाआड
By admin | Updated: April 13, 2016 01:18 IST