भेजगाव : मानवाच्या जीवनातील शेवटच्या क्षणी देहावसन झाल्यानंतर त्याला अग्नी देऊन किंवा मातीत पुरून दफन केल्या जाते. काही गावात जागेअभावी शेड उभारून तिथे अग्नी दिल्या जाते. अग्नी देताना मृतदेह पूर्णपणे जळावा या हेतुने लाकडांसोबत काही ठिकाणी रॉकेलचा वापर केला जातो. मात्र मूल तालुक्यातील भेजगाव येथे माणसाला जीवंतपणी तर, नाहीच मात्र मेल्यानंतरही रॉकेल मिळत नसल्याने गावात रॉकेल विक्रेत्याविरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे.भेजगाव येथे परवानाधारक तीन विक्रेते आहेत. तिघांकडेही जवळपास महिन्याकाठी आठ ड्रम रॉकेल येते. मात्र परवानाधारक आपल्या स्वार्थासाठी रॉकेलचा काळाबाजार करीत असून त्यामुळे कार्डधारकांना कमी प्रमाणात रॉकेल देत आहे. रॉकेल संपल्याचे सांगून ग्रामस्थांची फसवणूक करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. सध्यास्थितीत गावात बहुतांश नागरिकांकडे वीज बल्बची सोय असल्याने रॉकेल दुकानातुन सोडविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे लाभधारकांचे रॉकेल महिना ते महिना संबंधित दुकानदाराकडे उपलब्ध असायला पाहिजे.मात्र रॉकेल मिळत नसल्याने कार्डधारकांमध्ये मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या कार्डवरील रॉकेल दुसऱ्याला विकत असल्याने रॉकेलधारक दुकानदाराविरोधात व प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहे. सतत वाढत असलेली महागाई बघता रॉकेलचा वापर खाजगी वाहनात होत असल्याने सामान्य माणसाला रॉकेल मिळणे कठिण झाले आहे. चौकशी करून कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील आठवड्यात विश्वनाथ शेंडे यांचे देहावसन झाले. त्यांना चिताग्नी देण्याकरिता एकाही दुकानात रॉकेल मिळाले नाही. परिणात: दुसऱ्या ठिकाणाहून रॉकेल मिळवून चिताग्नी द्यावी लागली. अवैध विक्रीकडे लक्ष देवून रॉकेल विक्रेत्यांना समज द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
चिताग्नी देण्यासाठीही रॉकेल नाही
By admin | Updated: December 18, 2014 00:53 IST