रवी जवळे - चंद्रपूरताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत. एकट्या चंद्रपुरात दररोज तब्बल ३0 लाखांचा खर्रा फस्त केला जात आहे. सिगारेट, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा खप वेगळाच. नागरिकांवर पडलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा हा विळखा निश्चितच गंभीर आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या सात लाखांच्या घरात पोहचली आहे. यातील ३७ टक्के लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब अशी की यातील १५ टक्के सख्या महिलांची आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील दंतरोग चिकित्सक संदीप पिपरे यांनी दिली. चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात दोन हजारांच्या जवळपास पानटपर्या आहेत. यातून नियमित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. याशिवाय किराणा दुकानामधूनही हे पदार्थ विकले जातात. यातील काही पानटपर्यांमधून दररोज २00 ते ३00 र्खे विकले जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. गल्लीबोळातील पानटपर्यामधून एका दिवसात एवढय़ा खर्र्यांचा खप होत नसला तरी ७५ ते १५0 खर्रे तिथूनही विकले जातात. या माहितीवरून सरासरी १00 र्खे एका पानटपरीमधून दररोज विकले जात आहे. एका खर्र्याची किमत १५ रुपये, याप्रमाणे दोन हजार पानटपरीमधून दररोज ३0 लाखांचा खर्रा खाऊन थुंकला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अगदी १३ वर्षांचे मिसरुड आलेले, न आलेले मुलेही या व्यसनात आकंठ गुरफटले आहेत. चॉकलेट, बिस्कीट व फळे खायच्या वयात ही मुले चक्क खर्रा चघळताना दिसतात. दर एक तासात एक खर्रा फस्त करणार्यांचा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो. पूर्वी गुटखा अधिकृतपणे विकला जायचा. तेव्हा कर्करोगांचे प्रमाण अधिक होते. आता गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कमी झाले असले तरी खर्रा खाणार्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. पैशाचा चुराडा, आजाराची भीती या शौकीनांना नाहीच; पण सामाजिक बांधिलकीची जाणही नाही. खर्रा खाऊन ती घाण कुठेही थुंकली जाते. शहरातील हजारो भिंतीचे नकाशे झाले आहेत. या शौकिनांनी शासकीय कार्यालयेही सोडली नाही. अनेक कार्यालयांच्या भिंती आज खर्रा खाणार्यांची संख्या दर्शवित आहे. शहरात कुठलेही दुकान उघडण्यापूर्वी पानठेला उघडला जातो. त्यांचा हा दिनक्रम मग रात्री १२ वाजेपर्यंत सुरूच असतो.
चंद्रपुरात रोज चघळले जातात ३0 लाखांचे र्खे
By admin | Updated: May 30, 2014 23:33 IST