लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातजणांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यानंतरही त्यांची उमेदवारी कायम ठेवल्याने सात उमेदवारांनी सोमवारी (दि. १६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. यांसदर्भात संबंधित उमेदवारांना नोटीस बजावल्याची माहिती उमेदवार विलास आबाजी मोगरकार यांनी 'लोकमत'ला दिली. या घडामोडींमुळे चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवी कलाटणी मिळाली आहे.
विलास आबाजी मोगरकार यांनी उमाराणी रवींद्र मरपल्लीवार यांच्या उमेदवारीस, दिनेश दादाजी चोखारे व अश्लेषा शरद जीवतोडे यांनी रिता सुभाष रघाताटे यांच्या उमेदवारीस, पुरुषोत्तम गणपती रेचनकार यांनी उल्हास करपे व अमर बोडलावार यांच्या उमेदवारीस, नागेश्वर देवीदास ठेंगणे यांनी सुदर्शन निमकर यांच्या उमेदवारीस, जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांनी विजय रामचंद्र देवतळे यांच्या उमेदवारीस आणि शेखर रामचंद्र धोटे यांनी विजय चिंतामण बावणे यांच्या उमेदवारीस आव्हान दिले आहे.
काय आहे प्रकरण : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी १० जुलै २०२५ रोजी निवडणूक होणार आहे. अर्ज छाननीनंतर १५५ उमेदवारांची नामांकनपत्रे वैध ठरविण्यात आली होती. या छाननीदरम्यान सात उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी हे सर्व अर्ज वैध ठरवले. या पात्रतेला सात उमेदवारांनी उच्च न्यायालयातआव्हान दिले आहे. २७ जून ही नामांकन मागे घेण्याची तारीख आहे.