श्रीलंकेतून आला कलश : दर्शनासाठी अलोट गर्दीचंद्रपूर : चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीवर ५९ वर्षापूर्वी १६ आॅक्टोबर १९५६ ला डॉ.बाबासहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना तथागताच्या बुद्ध धम्माची दीक्षा दिली. ही जगातील अद्भूत व ऐतिहासिक घटना या पवित्र भूमिवर घडली. या क्रांतीकारी घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी श्रीलंकेतील पुरातत्व विभागाने उपलब्ध करून दिलेला बुद्ध-भीम अस्थिधातू कलश येथे दाखल झाला आणि या अस्थिकलशाच्या स्पर्शाने दीक्षाभूमी पुन्हा एकदा धन्य झाली. या पवित्र कलशाच्या दर्शनासाठी बौद्ध बांधवांची अलोट गर्दी उसळली होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्यावतीने आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या दुसऱ्या दिवशीचा प्रारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन व श्रीलंका येथील पुरातत्व विभागाकडून प्राप्त तथागत भगवान बुद्धांचा पवित्र अस्थिधातूकलश व बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह भिक्खू संघाच्या आणि समता सैनिक दलाच्या पथसंचलनासह मिरवणुकीने झाला. संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या नेतृत्वात ही मिरणूक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामुहिक बुद्ध वंदनेनंतर बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर ही मिरवणूक जटपुरा मार्गे प्रियदर्शिनी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर पोहचली. या मिरवणुकीत समता सैनिक दलाचे ५०० सैनिक सहभागी झाले होते. ही मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहचल्यानंतर भदन्त आर्य नागाजूर्नन शुरेत्र ससाई यांच्या हस्ते बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिकलश व बाबासाहेबांच्या अस्थिकलशास जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आले. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली.कार्यक्रमाची सुरूवात सामूहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेंडे व संचाने स्फुर्तीगिते सादर केली. या अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई होते. (प्रतिनिधी)
अस्थिकलश स्पर्शाने दीक्षाभूमी धन्य
By admin | Updated: October 17, 2015 01:30 IST