लोकमत न्यूज नेटवर्कमूल : विविध विकासकामांच्या माध्यमातून मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण करतोय. हे शहर राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून मान्यता प्राप्त ठरावे, हे आपले स्वप्न आहे. या स्वप्नपुर्तीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. मूल शहरातील नागरिकांच्या शुभेच्छांच्या आणि सहकार्याच्या बळावर हे स्वप्न निश्चीतपणे पूर्ण होईल, असा विश्वास अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.मूल येथे तहसील तसेच उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळयानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, भाजपा नेते प्रमोद कडू, मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, शहर भाजपाध्यक्ष प्रभाकर भोयर, सभापती पूजा डोहणे, चंद्रकांत आष्टनकर, पं. स. उपसभापती चंदू मारगोनवार, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता साखरवाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्री, कार्यकारी अभियंता जयस्वाल, तहसीलदार सरोदे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, या मतदार संघाने माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केला आहे. या प्रेमाच्या माध्यमातुनच जनसेवेची संधी मला लाभली आहे. त्यामुळे या मतदार संघातील उपक्रमांचे भूमीपूजन असो वा लोकार्पण मला नेहमीच विशेष आनंद लाभतो. मूल शहर व तालुक्यातील विकासकामांचा वेग हा बुलेटचा वेग आहे. यासाठी अधिकारी वर्गाचे कार्यसुध्दा निश्चितच अभिनंदनीय आहे. शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आपण संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. शहरातील रस्ते विकास, ड्रेनेज याला आपण प्राथमिकता दिली आहे. शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला आहे. नागरिकांनी विकासासंबंधी केलेली प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रक्रियेत जनतेचे लाभलेले सहकार्य मी विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी २५ लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे लोकार्पण, पाच कोटी रूपये निधी खर्चुन बांधण्यात येणाऱ्या विश्रामगृहाचे भूमीपूजन, ६.६९ कोटी रूपये निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
मूल राज्यातील सर्वोत्तम शहर ठरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:11 IST
विविध विकासकामांच्या माध्यमातून मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण करतोय. हे शहर राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून मान्यता प्राप्त ठरावे, हे आपले स्वप्न आहे. या स्वप्नपुर्तीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. मूल शहरातील नागरिकांच्या शुभेच्छांच्या आणि सहकार्याच्या बळावर हे स्वप्न निश्चीतपणे पूर्ण होईल, असा विश्वास अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मूल राज्यातील सर्वोत्तम शहर ठरावे
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : प्रशासकीय भवन व पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा