प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : खरीप हंगामाला सुरुवात होताच कापूस व सोयाबीन पिकाची सरी वरंभा पद्धतीने बेडवर लागवड करण्याकरिता वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेड तयार करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा आठ हजार ते १० हजार हेक्टरवर बेड लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जवळपास ५० हजार हेक्टरवर बेड पद्धतीने कापूस व सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने नियोजन सुरू केला आहे.
चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार व मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी मागील वर्षी बेडवर लागवड करण्याकरिता सोयाबीनची अष्टसूत्री विषयावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणावर भर दिला. वरोरा तालुक्यातील चिनोरा, शेगाव बु, राळेगाव आदी परिसरात शेतकरी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊन ४० हजार हेक्टरवर कापूस व सोयाबीनची बेडवर लागवड केली. अतिवृष्टी होऊनही पिके बुरशी रोगापासून रोगमुक्त राहिली व सरासरी उत्पन्नामध्ये वाढ झाली. यावर्षी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मागील वर्षाचे अनुभव लक्षात घेता परिसरामध्ये सर्वत्र बेड तयार करण्याची मोहीमच हाती घेतली.
वरोरा कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, घनश्याम पाटील व उपकृषी अधिकारी प्रफुल्ल आडकिने, गजानन सवंडकर, लता दुर्गे यांनी विशेष प्रयत्न केले व शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन बेड तयार करण्याच्या पद्धती समजून सांगितल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर आवश्यक पाऊस पडताच बेडवर कापूस व सोयाबीन लागवडीसाठी तयार आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.
कृषिमंत्र्याने घेतली होती दखलमागील वर्षी वरोरा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्याही परिस्थितीमध्ये तालुक्यातील ४० हजार हेक्टरवरील कापूस व सोयाबीन पिके वाचवण्यात तालुका कृषी विभागाला यश प्राप्त झाले होते. ही बातमी 'लोकमत' वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली होती.
"वरोरा तालुक्याचे वार्षिक प्रजन्यमान ११०० ते १३०० मिमी असल्याने अतिवृष्टीमध्ये पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. बिबी एफ व बेडवर लागवड करून नुकसान टाळता येते हे प्रशिक्षण व मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. मागील वर्षीच्या चांगला अनुभवाने यंदा पेरा वाढला."- विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगांव
"मागील वर्षी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बेडवर टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यामुळे ऑगस्ट महिन्यात दोनवेळा अतिवृष्टी होऊनसुद्धा पिकाची वाढ चांगली होऊन सरासरी उत्पादनात ३ ते ४ क्विंटलने वाढ दिसून आली."- प्रमोद कुंभारे, शेतकरी, अर्जुनी