वरोरा रेल्वे स्थानकावरील घटना : चार लाखांचे सोने मिळाले परत वरोरा : सिकंदराबाद येथून रेल्वेने वरोरा येथे एक कुटुंब उतरले. त्यानंतर रेल्वे जाताच रेल्वेमध्ये बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्या कुटुंबियानी वरोरा रेल्वे स्थानकावर असलेल्या आरपीएफ जवानास माहिती दिली. या जवानाने तातडीने संपर्क केला तेव्हा ती बॅग बुट्टीबोरी येथील रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांनी उतरवून त्या प्रवाशांना बोलावून परत केली. त्या बॅग मध्ये चार लाख रुपये किंमतीचे सोन होते. सोने सहीसलामत असल्याने त्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.सिकंदराबाद-नागपूर या रेल्वेने सिकंदराबाद येथून एक कुटुंब प्रवास करीत पहाटे वरोरा रेल्वे स्थानकावर उतरले. त्यांना वरोरा रेल्वे स्थानकावरुन नंदीग्राम एक्स्प्रेसने वणी येथे जायचे होते. वरोरा रेल्वे स्थानकावर उतरताच रेल्वे सुरु झाली. त्यामध्ये कुटुंबीयाची बॅग राहून गेली. ही बाब लक्षात येताच वरोरा रेल्वे स्थानकावरील आरपीएफ चौकीत धाव घेतली व येथे कार्यरत जवान आर. टी. दाबेराव यांना माहिती दिली. दाबेराव यांनी तत्काळ सेवाग्राम, बुट्टीबोरी, हिंगणघाट, नागपूर आदी आरपीएफ ठाण्यात माहिती दिली. ही बॅग बुट्टीबोरी येथील आरपीएफ उपनिरीक्षक गिरीश तिवारी यांनी उतरवून घेत वरोरा येथील आरपीएफला कळविले. आरपीएफ जवान आर. टी. दाबेराव यांनी बॅग बुट्टीबोरी येथील रेल्वेस्थानकावरील आरपीएफ चौकीत असल्याचे माहिती कुटुंबीयास देऊन त्यांना बुट्टीबोरी येथे जाण्यास सांगितले. बुट्टीबोरी येथे बॅग व त्यातील साहित्य सुरक्षित असल्याचे बघून ते कुटुंब सुखाहून गेले. जवानाच्या प्रामाणिकपणा बद्दल रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्याकरिता कुटुंबाने तयारी दर्शवली. परंतु आरपीएफ जवानांनी बक्षिस नाकारून आपले कर्तव्य सिद्ध करत प्रामाणिकपणा दाखविला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानत पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. (तालुका प्रतिनिधी)
जवानाच्या सतर्कतेने गवसली विसरलेली बॅग
By admin | Updated: June 10, 2015 01:33 IST