बल्लारपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने महाराष्ट्र शासनाने हिवाळी अधिवेशनात पारित केलेल्या जादुटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी जनसंवाद यात्रा ८५ दिवसात संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. २५0पेक्षा जास्त कार्यक्रमामध्ये या कायद्याबद्दल प्रबोधन केले आहे. यात्रेचे बल्लारपूर शहरात आगमन होऊन येथेही प्रबोधन कार्यक्रम पार पडला.सर्वसेवा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे सचिव प्रा. अनिल शिंदे व बल्लारपूर महिला महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. सुलभा गावंडे यांनी यात्रेचे स्वागत केले. बल्लारपूर महिला महाविद्यालयामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुर्यकांत खनके यांनी जनसंवाद यात्रेचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केला. महाराष्ट्र अंनिसचे राज्य सहकार्यवाह गजेंद्र सूरकार यांनी समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याची माहिती तसेच शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे जादुटोणा विरोधी कायद्यासाठीच्या लढय़ात दिलेले योगदान यावर मार्गदर्शन केले. पी.एम. जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावरील गीत सादर केले. प्राचार्या डॉ. सुलभा गावंडे यांनी अनेक प्रात्याक्षिक करून दाखविले. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपुरात अंनिसचा प्रबोधन कार्यक्रम
By admin | Updated: May 8, 2014 01:51 IST