पोंभूर्णा : सेल्लुर नागरेड्डी येथील मामा तलावाचे पाणी शेतीसाठी उपसा करण्यास मज्जाव करीत असलेल्या मच्छी ठेकेदारावर कारवाई न करता, शेती पिकास धोका निर्माण करणाऱ्या संवर्ग विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबिंत करण्यात यावे आदी मागण्यांसाठी पोंभूर्णा येथे शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी चार दिवसानंतर आज उपोषण सोडले. पोंभूर्णा तालुक्यातील सेल्लुर नागरेडी व वेळवा येथील शेतकरी रघुनाथ सोमा बांबोळे व इतर सहा शेतकरी आपल्या शेतातील धानपिकास ५७ सर्व्हे नंबर मधील मामा तलावाचे पाणी उपसा करण्यासाठी लेखी निवेदन देऊन पंचायत समिती पोंभूर्णा व संबंधित कार्यालयाकडे मागणी केली होती. या मागण्यांची पुर्तता न झाल्याने ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. याची दखल घेऊन आज दुपारी ११ वाजता चंद्रपूर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, तहसीलदार राजेश सरवदे, ठाणेदार डी.आर. डोलारे यांनी उपोषणकर्त्यांला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. सदर प्रकरणाची दोन महिन्याच्या कालावधीच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर यांचेकडून समिती नेमून चौकशी करण्यात येईल, असे उपोषणकर्त्यांला आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण १२ वाजता उपोषण सोडले. यावेळी विस्तार अधिकारी सावसाकडे, जोनमवार, तलाठी लोणकर, पोंभूर्णा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन रणदिवे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
चार दिवसानंतर शेतकऱ्यांनी उपोषण सोडले
By admin | Updated: December 11, 2014 23:05 IST