लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाचा त्वरित निकाल लागावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा तडजोड करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रकरणे रखडत गेली. दरम्यान, यावेळी आयोजित लोकअदालतमध्ये तडजोड करून ३९५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामुळे पक्षकारांना दिलासा मिळाला असून कोर्टकचेरीची पायपीट थांबली आहे.जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित समझोतायोग्य प्रकरणे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची तसेच न्यायालयात येण्याअगोदरची प्रकरणे ठेवण्यात आली. यामध्ये विविध बँका, विमा कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल. कंपनींचे अधिकारी आणि पक्षकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्याकरिता त्यांनी आपसात चर्चा केली आणि सामंजस्याची भूमिका घेऊन तडजोडीने वाद मिटविले. परिणामस्वरुप या लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित २३९ प्रकरणे आणि दाखलपूर्व १५६ प्रकरणे असे एकूण ३९५ प्रकरणे एकाच दिवशी निकाली निघाले. सदर प्रकरणांमध्ये एकूण १ कोटी ६३ लाख ६७ हजार ६७८ मुल्यांच्या वादाबाबत तडजोड झाली.या लोक अदालतीमध्ये प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रभाकर मोडक आणि के. पी. श्रीखंडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर शिवकांत काळे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एम. ए. शिलार, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश एस. झेड. खान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. भटेवरा, एस. एस. कुळकर्णी, एन. व्ही. रणवीर व एस. डी. मुक्कनवार यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहिले.सामंजस्याची भूमिका हाच उद्देश : शिंदेसामंजस्याची भूमिका घेऊन तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत कार्य करीत असते. यासाठी दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकूण घेत तोडगा काढून सामंजस्याची भूमिकेतून प्रकरणाचा निपटारा केला जात असल्याचे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सदर प्रकरणांमध्ये एकूण रुपये १ कोटी ६३ लाख ६७ हजार ६७८ इतक्या मूल्याच्या वादांवर तडजोड झाली. लोकअदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांचे समाधान होत असून यातून वेळ, खर्चाची बचत होते.
३९५ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST
चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाचा त्वरित निकाल लागावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा तडजोड करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रकरणे रखडत गेली.
३९५ प्रकरणे निकाली
ठळक मुद्दे लोकअदालत : १ कोटी ६३ लाख ६७ हजारांची तडजोड