चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत २८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, २२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ८५० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार १९३ झाली आहे. सध्या २७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८९ हजार ३९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ६४ हजार ८४८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३८१ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १२, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधित आलेल्या २२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील आठ, भद्रावती सात, नागभिड एक, वरोरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही. कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यांतून अद्यापही आढळून येत आहेत. तरी, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे. बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.