चंद्रपूर : बालकांना मोफत तसेच सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात आरटीईच्या १५७१ जागांसाठी बुधवारपर्यंत पालकांनी आपल्या पाल्याचे २१५० ऑनलाईन अर्ज भरले आहेत. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी आणखी चार दिवसाचा अवधी आहे. त्यामुळे यावर्षीही प्रवेशासाठी पालकांना वाटच बघावी लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी १९६ शाळांनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेकरिता २५ टक्क्यानुसार १५७१ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ३ मार्चपासून पालकांनी अर्ज भरणे सुरू केले असून, बुधवारपर्यंत २१५० पालकांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी आणखी चार दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे या अर्जामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शहरातील पालकांनी अधिक प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत.
बाॅक्स
१९६ शाळा २१५० जागा
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात १९६ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये या वर्षासाठी १५७१ रिक्त जागा आहेत. यासाठी पालकांनी अर्ज भरले आहेत. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अर्ज भरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
बाॅक्स
नामांकित शाळांनी नर्सरीचा प्रवेश टाळला
चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात नामांकित खासगी इंग्रजी शाळा आहेत. मात्र यातील काही शाळांनी नर्सरीसाठी प्रवेश टाळल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, जेटपुरा गेट, रामनगर, दाताळा रोड, चोरखिडकी आदी परिसरात केवळ एका शाळेनेच आरटीईअंतर्गत नर्सरीसाठी प्रवेश सुरू ठेवला आहे. अन्य शाळांनी मात्र नर्सरीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे टाळल्याने परिसरातील गोरगरीब पालकांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये खर्च करून नर्सरीसाठी आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा लागणार आहे.