वनविभागाचे प्रयत्न: सामाजिक संस्थांचीही मदतजळगाव जामोद : उन्हाळ्यात सातपुड्यातील सर्व नदया-नाले आटून जातात. अशावेळी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागते. आणि या भटकंतीमध्ये अनेकदा हे वन्यप्राणी लोकवस्तीतही भटकतात तर काही पाण्याअभावी मृत्यू पावतात. त्यासाठी जळगाव जामोद वनपरिक्षेत्राधिकारी यांनी संभाव्य दखल घेवून सातपुड्याच्या जंगलामध्ये नैसर्गिक १० पानवठे निर्माण करुन वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.तालुक्याच्या उत्तरेस पूर्ण सातपुडा पर्वत असून या सातपुड्यात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. यामध्ये वाघ, बिबट, अस्वल, हरिण, रानडुक्कर, निलगाय, सांबर, तडसे इत्यादी वन्यप्राण्यांसह पक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात हिरवळ आणि नदी नाल्यांनी खुळाळणारा सातपुडा उन्हाळ्यात एकदम रुक्ष वाळवंटासारखा होतो. नदयांचे-नाल्यांचे पाणी आटून जाते. झरेही कोरडे पडतात. अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी पंचाईत होते. हे प्राणी मग लोकवस्तीकडे धाव घेतात आणि अशावेळी त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांनी जंगल सोडू नये त्यासाठी जंगलातच कृत्रीम परंतु एकदम नैसर्गिक वाटणारे पानवठे निर्माण करुन त्यांची तहान भागवण्याची व्यवस्था सातपुड्यात जळगाव वनविभागाने केली आहे.या वनपरिक्षेत्रात एकूण जामोद, खांडवी, जळगाव आणि वरवट हे चार बिट आहेत. त्यामध्ये खांडवी बिटमध्ये ३, जळगाव बीट ३, जामोद २ आणि वरवट बिटमध्ये २ असे एकूण १० पानवठे तयार करण्यात आले आणि या प्रत्येक पानवठ्यामध्ये दर ५ ते ६ दिवसानंतर ३ हजार लिटरचे १ टँकर पाणी सोडण्यात येते आणि मग वन्यप्राण्यांना पिण्यास सोयीचे ठरते. हे १० पानवठे सातपुड्यातील निमखेडी, हनवतखेड, इस्लामपूर, पूर्व रायपूर, पश्चीम रायपूर, भेंडवळ, पिंगळी आणि जामोद या परिसरात तयार करण्यात आले आहेत.असे बनवतात नैसर्गिक पानवठे४वन्यप्राण्यांना कुठेही कृत्रीमतेचा आभास होवू नये. त्यांनी नि:संकोचपणे पाणी पिण्यासाठी यावे म्हणून पानवठे बनवितांना विशेष काळजी घेतली जाते. यासाठी साडेपाच मिटर व्यासाचा खड्डा खोदला जातो. त्यामध्ये खाली काळीमाती त्यावर गवत टाकतात. गवतावर पॉलीथीन अंथरले जाते आणि त्यावर बारीक दगड, वाळू आणि थोडी काळी माती टाकण्यात येते. त्यामुळे हे पानवठे एकदम नैसर्गिक वाटतात आणि त्यामध्ये पाणी सुध्दा साचुन राहते. सदर पानवठे ज्या भागात वन्यप्राण्यांचा अधिक वावर आहे अशा भागामध्ये घेण्यात आले. त्यासाठी सन्मानग्रुपचे हि भरपूर सहकार्य मिळाले. त्यांनी जागा शोधण्यास मदत केली तर सदर पानवठ्यामध्ये एप्रील, मे आणि जून असे दोन ते अडीच महिने जोपर्यंत पाऊस पडत नाही. तोपर्यंत टँकरने पाणी सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी नवनाथ कांबळे यांनी सांगितले.
सातपुड्यातील वन्यप्राण्यासाठी पाणवठे तयार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 22:35 IST