चिखली (जि. बुलडाणा): सुरुवातीला दमदार आगमन करून शेतकर्यांच्या आशा पल्लवित केलेल्या पावसाने पेरणीपश्चात १५ ते २0 दिवसांच्या कालावधीत दडी मारल्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हे संकट दूर व्हावे, यासाठी तालुक्यातील सवणा येथील युवकांनी रक्तदान करून वरुणराजाला साकडे घातले. या माध्यमातून रक्तदानाचे पवित्र कार्यही घडून आले. शेतकर्यांनी पेरणी करून सुमारे २0 दिवसांचा कालावधी उलटला आहे; परंतु सुरूवातीला दमदार आगमन केलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. पावसासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने वरुणराजाला साकडे घालत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सवणा येथील युवकांनी सामाजिक जाणिवेतून वरुणराजाला साकडे घालण्यासोबतच गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा व्हावा, या हेतूने ५ जुलै रोजी रक्तदान करून वरुणराजाला साकडे घातले. नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे व सुहास शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे अयोजन करण्यात आले होते. यामध्ये सवणा येथील ३५ युवकांनी रक्तदान केले.
रक्तदानाने वरुणराजाला साकडे
By admin | Updated: July 7, 2015 00:01 IST