नीलेश शहाकार - बुलडाणामान्सूनपूर्व वीज जोडणी व दुरुस्तीची कामे १५ दिवसांत पूर्ण करा, असे आदेश महावितरणला राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले. शेतकरी खरीप पेरणीच्या उंबरठ्यावर असताना जिल्ह्यात कृषी पंप वीज जोडणीचे २२६४ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्णत: पावसावर अवलंबून असला तरी ऐनवेळी पावसाने पाठ फिरवली की, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा आधार द्यावा लागतो. शिवाय शेताच्या मशागतीसाठीसुद्धा वीज आवश्यक आहे.जिल्ह्याचा खरीप हंगामपूर्व नियोजन आराखडा १३ एप्रिल रोजी सादर करण्यात आला. यानुसार जिल्ह्यातील पंधरा उपविभागात २ हजार २६२ कृषी पंप वीज जोडणी अर्ज प्रलंबित असल्याची बाब पुढे आली. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ९ हजार ३०३ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयाकडे अर्ज केले होते. मार्च २०१७ अखेरपर्यंत ७ हजार अर्जाबाबत कार्यवाही करण्यात आली, तर इतर अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.विभागात २१ हजार अर्ज प्रलंबितगत पाच वर्षांपासून विदर्भातील शेतकरी दृष्टचक्रात अडकला आहे. यातून सोडविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे; मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडणीचे प्रलंबित अर्जाची संख्या २१ हजार २५९ एवढी आहे़
कृषी पंप वीज जोडणीचे दोन हजार प्रस्ताव प्रलंबित!
By admin | Updated: April 18, 2017 00:44 IST