खामगाव : दसरा, दिवाळी, भाऊबीज या सणासुदीच्या दिवसात एसटी, रेल्वेसह खासगी प्रवासी वाहतुकीवर प्रवाशांची गर्दी वाढली असून, रेल्वे, एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या काळात नेहमीपेक्षा २५ टक्के प्रवासी जास्त असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.दिवाळीनिमित्त पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणी कामानिमित्त असणारे लोक गावी परततात. त्यामुळे बाहेरून येणार्या गाड्यांमध्ये गर्दी असते. ग्रामीण भागातून शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी खरेदीसाठी येतात. त्यामुळे एसटी बस तुडुंब भरून जात आहेत. दिवाळीनंतर पाडवा, भाऊबीज या काळात गर्दीचा ओघ आणखीच वाढ तो. विशेषत: भाऊबीजेसाठी माहेरी जाणार्या महिलांची संख्या वाढल्याने गर्दी होते. याबाबी लक्षात घेऊन एसटी महामंडळार्फे जादा बस सोडण्यात आल्या आहेत. गर्दीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, वेळेवर बस मिळाव्यात यासाठी आगारांकडून नियोजन करण्यात आले आहे. खामगाव, तसेच जिल्ह्यातील इतर आगारांतून नागपूर, अमरावती, जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी आदी मोठय़ा शहरांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचा कालावधी असल्याने आहे त्या बसच्या फेर्याही वाढविण्यात आल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता अवैध प्रवासी वाहतूकही जोरात आहे. चौकाचौकांतून जीप, तीनचाकी रिक्षा भरून जात आहेत.शेगाव रेल्वेस्थानकावरही प्रवाशांची वर्दळ आहे. नोकरीनिमित्त परराज्यात, तसेच सैन्यात असलेले जवान दिवाळीला गावाकडे येत आहेत. सलग असलेल्या सुट्यांत अनेकांनी पर्यटनासाठीही बुकिंग केले आहे. त्यामुळेही रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होत आहे. दिवाळी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसांचा कालावधी एसटीसाठी गर्दीचा असतो. त्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी महामंडळ घेत असल्याचे खामगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख सुभाष पाटील यांनी सांगीतले.
एसटी, खासगी वाहतूक फुल!
By admin | Updated: October 26, 2014 23:33 IST