शेगाव : तूर खरेदीनंतर मार्केट यार्डात पडून असलेल्या तुरीचे पंचनामे सनियंत्रण समितीमार्फत शनिवारी करण्यात आले. यावेळी शेतकरी व अधिकार्यात झालेल्या बाचाबाचीनंतर संतप्त शेतकर्यांनी रास्ता रोको केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलीसांना पाचारण करण्यात आल्यानंतर पुन्हा पंचनामे सुरु झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेड केंद्रातर्फे २२ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद झाल्यानंतरही जवळपास १८ हजार क्विंटल तूर मोजमापासाठी पडून होती. प्रत्यक्ष नोंद झालेल्या तूरीचे सनियंत्रण समितीमार्फत पंचानामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिल्यानंतर शनिवारी दुपारी बारा वाजता संनियत्रण समितीचे सदस्य असलेले साहाय्यक निबंधक एस. पी. पोहरे, कृउबास सचिव विलास पुंडकर, खविसंचे अधिकारी मनोहर ताठे, पणन महासंघाचे शिंगणे यांच्या उपस्थितीत तूरीचे पंचनामे करण्यात आले. मात्र तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा मुद्दा शेतकर्यांनी उचलून धरला. यावेळी शेतकरी व अधिकार्यात बाचाबाची झाली. अधिकार्यांकडून अपेक्षित उत्तरे न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या जवळच असलेल्या जगदंबानगर चौकात काहीवेळ रास्ता रोको केला. यावेळी पोलीसांना घटनास्थळी धाव घेतली व संतप्त शेतकर्यांची समजूत काढली. त्यानंतर वातावरण निवळले व पुन्हा सुरु करण्यात आले.
शेगावच्या नाफेड केंद्रावर पंचनाम्यादरम्यान गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 02:50 IST